नागरी समस्यांच्या जाळ्यात नरसाळा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:07 IST2021-02-08T04:07:28+5:302021-02-08T04:07:28+5:30
रस्ते अर्धवट, गडरलाईन अपूर्ण : उद्यानांचा अभाव, अस्वच्छता, दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात नागपूर : नागपूर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू ...

नागरी समस्यांच्या जाळ्यात नरसाळा ()
रस्ते अर्धवट, गडरलाईन अपूर्ण : उद्यानांचा अभाव, अस्वच्छता, दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात
नागपूर : नागपूर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहरातील रस्ते चकाचक होत असल्याचा दावा केला जात आहे. शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा पुरविण्याचा दावा मनपातील पदाधिकारी व प्रशासनाकडून केला जात आहे. दुसरीकडे नागपूर शहरातील अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ‘लोकमत’ने नरसाळा भागातील समस्यांची पाहणी केली असता नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. या परिसरात रस्त्याची समस्या गंभीर आहे. परिसरात गडरलाईन नसल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. गार्डनमध्येही कुठलीच व्यवस्था नाही. अशा एक ना अनेक समस्यांमुळे नरसाळावासी त्रस्त झाले आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही महापालिकेच्या वतीने काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
गुलमोहरनगरात घाण पाणी विहिरीत
गुलमोहरनगरात गडरलाईन नाही. त्यामुळे शौचालयाचे पाणी नागरिकांच्या विहिरीत शिरत आहे. नागरिकांनी अनेकदा परिसरातील नगरसेवकांना तक्रारी केल्या. परंतु कुणीच या समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाही. या भागात गार्डनसाठी जागा सोडली आहे. परंतु गार्डनमध्ये खेळणी नसल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत आहे. गार्डनमध्ये ग्रीन जीम आहे. मात्र तेथे गवत वाढल्यामुळे त्याचा फायदा नागरिकांना होत नाही. गार्डनमध्ये घाण पाणी साचलेले असल्यामुळे तेथे उभे राहण्याचीही इच्छा होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. गडरलाईनअभावी या भागातील विहिरी प्रदूषित होत असल्यामुळे महापालिकेने त्वरित गडरलाईनची व्यवस्था करून देण्याची गरज आहे.
भारतमाता नगरात पावसाचे पाणी घरात
भारतमातानगर तसेच चाणक्यपुरम सोसायटीत पावसाळ्यात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या भागात गार्डनमध्ये खेळणी नाहीत. त्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत आहे. पावसाळी नाल्या नसल्यामुळे पावसाळ्यात घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरते. परिसरात रस्ते उंचावर आणि नागरिकांची घरे खोलगट भागात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अधिक पाऊस आल्यास नागरिकांची गैरसोय होते. सगळीकडे पाणी साचते. या भागात अनेक रिकामे प्लॉट आहेत. या रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचते. तेथे डासांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगरपालिकेने रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
खराब रस्त्यांची जय अंबे सोसायटी
न्यू नरसाळा भागातील जय अंबे सोसायटीत रस्त्याची समस्या गंभीर आहे. या भागात बेसा पॉवर हाऊस ते न्यू नरसाळा रोडवर अर्धा सिमेंट रोड तयार करण्यात आला. परंतु अर्धा रस्ता खोदून ठेवल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. परिसरात गडरलाईन नाही. त्यामुळे पावसाळ्यात घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरते. या भागात रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत आहे. परिसरातील नागरिकांनी याबाबत अनेकदा नगरसेवकांकडे तक्रारी केल्या. परंतु या समस्यांकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे महानगरपालिकेने या भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.
वाहनचालकांची कसरत
‘जय अंबे सोसायटीत रस्त्याची समस्या गंभीर आहे. अर्धा सिमेंट रोड तयार झाला आहे. परंतु अर्धा रस्ता खोदून ठेवल्यामुळे गिट्टी रस्त्यावर पसरलेली आहे. वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. परिसरात गडरलाईन नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.’
- प्रशांत ढवंगाळे, नागरिक
गडरलाईन तरी करा
गुलमोहर कॉलनीत गडरलाईन नाही. त्यामुळे पावसाळ्यात घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. परिसरातील गार्डनमध्ये गवत वाढले आहे. गार्डनमध्ये लहान मुलांना खेळणी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सेफ्टी टँकचे पाणी विहिरीत शिरत असल्यामुळे त्या दूषित होत आहेत.
- ताराचंद मेंढे, नागरिक
रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करा
भारतमातानगरात नागरिकांनी प्लॉट घेऊन ठेवले आहेत. रिकाम्या प्लॉटवर पावसाळ्यात पाणी साचते. या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होतो. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे रिकाम्या प्लॉटधारकांवर महापालिकेने कारवाई करण्याची गरज आहे.
-राहुल डम्पलवार, नागरिक
सिव्हरेज लाईन महत्त्वाची
चाणक्यपुरम सोसायटीत सिव्हरेज लाईन नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पावसाळ्यात घाण पाणी परिसरात साचते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने परिसरात सिव्हरेज लाईनची व्यवस्था करण्याची मागणी अनेक वर्षांपासून नागरिक करीत आहेत. परंतु अद्यापही ही मागणी पूर्ण करण्यात न आल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
-संगीता रंगारी, गृहिणी
...............