समाजकार्य विद्यापीठावर नागपूरचाच दावा
By Admin | Updated: December 1, 2015 07:21 IST2015-12-01T07:21:11+5:302015-12-01T07:21:11+5:30
समाजकार्य विषयाच्या संशोधन व अध्ययनात सुसूत्रता यावी तसेच गुणवत्ता वाढावी यासाठी स्वतंत्र समाजकार्य विद्यापीठ

समाजकार्य विद्यापीठावर नागपूरचाच दावा
योगेश पांडे ल्ल नागपूर
समाजकार्य विषयाच्या संशोधन व अध्ययनात सुसूत्रता यावी तसेच गुणवत्ता वाढावी यासाठी स्वतंत्र समाजकार्य विद्यापीठ स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. देशातील अशा प्रकारच्या पहिल्या विद्यापीठाची स्थापना राज्यात नेमकी कुठे होणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरचा दावा यात सर्वात वर आहे. परंतु आपापल्या जिल्ह्यांमध्ये हे विद्यापीठ यावे यासाठी राज्यातील विविध भागांतील राजकारण्यांकडूनदेखील जोर लावण्यात येत आहे. एकूणच या विद्यापीठावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
आजच्या तारखेत महाराष्ट्रात एकूण ५२ समाजकार्य महाविद्यालये आहेत. ही महाविद्यालये राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत संचालित केली जातात. परंतु या महाविद्यालयांमध्ये शिक्षण व संशोधनासंदर्भात फारसे सुसूत्रीकरण व समन्वय नाही. त्यामुळे या महाविद्यालयांना एका विद्यापीठांतर्गत आणण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.
४ सप्टेंबर रोजी पुण्यात राज्यातील सर्व समाजकार्य महाविद्यालयांच्या प्राचार्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेतील चर्चेनुसार स्वतंत्र विद्यापीठाची मागणी सामाजिक न्यायमंत्र्यांकडे करण्यात आली. त्यानंतर या विद्यापीठाच्या कायद्याचे प्रारूप तयार करण्यासाठी पूरण मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या समितीच्या आॅक्टोबर महिन्यात नागपुरात बैठकादेखील झाल्या.
अद्याप या विद्यापीठाच्या स्थापनेचे काम अगदी प्राथमिक टप्प्यात आहे. मंत्रिमंडळाची पूर्ण मंजुरी मिळून याला सुरू होण्यास अद्याप बरीच मोठी प्रक्रिया बाकी आहे. परंतु हे विद्यापीठ आपल्याच जिल्ह्यात यावे यासाठी विविध पालकमंत्र्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या विद्यापीठासाठी नागपूरचा सर्वात मोठा दावा आहे.
राज्यातील ५२ पैकी २२ समाजकार्य महाविद्यालये नागपूर व अमरावती विभागात आहेत. त्यामुळे येथेच विद्यापीठ स्थापन व्हावे असे ज्येष्ठ अधिकारी तसेच समितीतील सदस्यांचे मत आहे.
परंतु नागपूरला अनेक ‘प्रीमिअर’ शैक्षणिक संस्थांची घोषणा झाली आहे. राज्यातील अनेक शैक्षणिक संचालकांची कार्यालये मुंबई-पुण्याकडेच आहे.
त्यामुळे हे विद्यापीठ पश्चिम महाराष्ट्रात यावे असा काही नेते तसेच पालकमंत्र्यांचा आग्रह आहे. संबंधित समितीने अद्याप हे विद्यापीठ कुठे निर्माण व्हावे याबाबत काहीही शिफारस केलेली नाही. या शिफारशीनंतर मंत्रिमंडळ याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.
जास्त महाविद्यालयांच्या भागालाच प्राधान्य : बडोले
यासंदर्भात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी संपर्क केला असता अद्याप हे समाजकार्य विद्यापीठ नेमके कुठे स्थापन करायचे याचा निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंबंधातील समितीच्या शिफारशींवर शासन विचार करेल. परंतु ज्या भागात जास्त समाजकार्य महाविद्यालये आहेत, तेथेच हे विद्यापीठ स्थापन झाले तर जास्त सोयीस्कर ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे त्यादृष्टीने शासन विचार करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.