लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पुन्हा कंत्राटी प्राध्यापकांच्या भरतीकडे वाटचाल करीत आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ९० पेक्षा अधिक कंत्राटी प्राध्यापकांची पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. मंजूर झालेल्या ९२ नियमित प्राध्यापकांच्या जागा भरण्यास विद्यापीठ प्रशासन अपयशी ठरल्याने ही वेळ आल्याचे बोलले जात आहे.
विद्यापीठात पस्तीसहून अधिक विभाग आणि तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. यापैकी बऱ्याच विभागांमध्ये तासिका तत्त्वावर कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. महत्त्वाचे म्हणजे, बऱ्याच विभागांमध्ये दहा ते पंधरा प्राध्यापक कंत्राटी म्हणून काम करताना दिसून येतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय आणि बॅरि. एस. के. वानखेडे शिक्षण महाविद्यालयात सर्वाधिक कंत्राटी प्राध्यापकांचा समावेश आहे. इतरही महाविद्यालयांत स्थिती सारखीच आहे. सत्रांत परीक्षा पद्धतीने दोन सत्रांसाठी प्राध्यापकांना नियुक्त करण्यात येते. या प्राध्यापकांना तासिकेप्रमाणेच वेतनही दिले जाते. मात्र, तासिका संपताच प्राध्यापक विभाग सोडून निघून जातात. विद्यापीठामध्ये ९२ प्राध्यापकांची पदे मंजूर झाली होती. मात्र, मधल्या काळात दिवंगत कुलगुरू डॉ. चौधरी निलंबित झाल्याने पदभरती रखडली. तर पुढे एलआयटी विद्यापीठामधून वेगळी झाल्याने प्राध्यापक भरतीच्या बिंदुनामावलीचा प्रश्न उपस्थित झाला. मात्र, वर्षभरापासून नियमित प्राध्यापकांची पदभरती करण्यास विद्यापीठ अकार्यक्षम ठरले. त्यामुळे पुन्हा एकदा कंत्राटी प्राध्यापकांची पदे भरण्याची वेळ आली आहे. कंत्राटी प्राध्यापकांना पूर्णवेळ काम आणि सहायक प्राध्यापकांचा दर्जा देण्यात येणार आहे. यामुळे प्राध्यापकांची विभाग आणि महाविद्यालयाप्रति जबाबदारी निश्चित करण्यात येईल. यासाठी त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक महिन्याला ४० हजार रुपये वेतन दिले जाणार असल्याची माहिती आहे.