लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर (ग्रामीण) उपविभागीय कार्यालयामार्फत परिक्षेत्रातील गावांमध्ये जनतेचे प्रश्न जनतेच्या गावात या संकल्पनेवर आठवड्यातील दोन दिवस जनतेशी संवादाचा कार्यक्रम राबवून जनतेचे प्रश्न गावातच सोडविण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्याच्या हा नागपूर पॅर्टन राज्यात राबविला जावा, अशी अपेक्षा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
मिहान प्रकल्पांतर्गत मौजा-खापरी (रेल्वे) गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना शनिवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रातिनिधिक पट्टे वाटप करण्यात आले. यावेळी एकूण ५०० पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने मिहान येथील पुनर्वसीत अभिन्यासातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, नागपूर (ग्रामीण) च्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, माजी जिल्हा परिषद सदस्य रुपराव शिंगणे, खापरीचे माजी सरपंच केशवराव सोनटक्के आदी यावेळी उपस्थित होते.
ज्या पात्र लाभार्थ्यांना पुनर्वसनाचा लाभ मिळाला नाही त्यांनी नव्याने अर्ज करावा आणि लाभ प्राप्त झालेल्या व्यक्तींनी पुन्हा अर्ज करु नये, असे आवाहनही महसूलमंत्री बावनकुळे यांनी यावेळी केले.
२६५ पात्र प्रकल्पग्रस्तांनाही लवकरच पट्टे वाटपजिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मौजा-खापरी (रेल्वे) गावठाणातील एकूण ७६५ पात्र प्रकल्पग्रस्तांना खापरी (रेल्वे) येथील गावठाणाच्या भूखंडावर संपूर्ण उच्च दर्जाच्या नागरी सुविधेसह सुमारे २८ हेक्टर क्षेत्रात पुनर्वसीत करण्यात आले आहे. यातील ५०० लाभार्थ्यांना शनिवारी पट्टे वाटप करण्यात आले. उर्वरित २६५ लाभार्थ्यांना लवकरच पट्टे वाटप करण्यात येणार आहे.