नागपूरकरच देतील ‘स्मार्ट सिटी’च्या टीप्स
By Admin | Updated: November 26, 2015 03:22 IST2015-11-26T03:22:36+5:302015-11-26T03:22:36+5:30
उपराजधानीची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. स्मार्ट सिटीत नागरिकांच्या सहभागाचा पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील भाग ‘अ’ला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

नागपूरकरच देतील ‘स्मार्ट सिटी’च्या टीप्स
भाग २ (ब) आजपासून : पुनर्विकासाबाबत जाणून घेणार विविध संकल्पना
नागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. स्मार्ट सिटीत नागरिकांच्या सहभागाचा पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील भाग ‘अ’ला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आज गुरुवारी दुसऱ्या टप्प्याच्या भाग २ (ब) ला सुरुवात होत आहे. दोन दिवसात रेट्रोफिटिंंगसाठी (पुनर्निर्माण) रिडेव्हलपमेन्ट (पुनर्विकास)यावर नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी महापालिका अभियान राबविणार असल्याची माहिती उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.
स्मार्ट सिटीतील पुनर्निर्माण व पुनर्विकास यासाठी प्रस्तावित प्रकल्पाची माहिती देण्यात येईल. हा प्रस्ताव मान्य की अमान्य आहे, असा साधा प्रश्न नागरिकांना विचारला जाईल. याशिवाय पहिल्या टप्प्यात स्वच्छतेला प्राधान्य देतानाच शहरातील नागरिकांच्या सुरक्षेवर भर दिला. त्यामुळे नागरिक ांचा सहभाग टप्पा दोन (क) यात सुरक्षेबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यात येईल. स्मार्ट सिटीसाठी उपराजधानीतील नागरिकांच्या संकल्पना मागितल्या होत्या. यात १३६५ संकल्पना प्राप्त झाल्या. तीन परीक्षकांनी यातील २० उत्कृष्ट संकल्पनांची निवड केली आहे. या संकल्पनांचे बुधवारी सादरीकरण करण्यात आले. या संकल्पना नागरिकांपुढे मांडण्यात येणार आहेत. परीक्षकांचे ७५ गुण व नागरिकांनी दिलेले २५ गुण विचारात घेऊ न सर्वाधिक गुण प्राप्त होणाऱ्या संकल्पनांची निवड केली जाणार आहे. यासाठी या संकल्पना आॅनलाईन करण्यात येतील. यावर नागरिक आपली पसंती नोंदवतील. सर्वाधिक गुणांच्या आधारे यातील दहा संकल्पनांची निवड केली जाणार आहे. या दहा संकल्पना सादर करणाऱ्यांना स्मार्ट सिटीचे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर म्हणून निवडले जाईल. तसेच दहापैकी एक ‘झकास ’ संकल्पनेबाबत ३० नोव्हेंबरपर्यंत नागरिकांची मते जाणून घेण्यात येईल. याची १ डिसेंबरला निवड करण्यात येईल, अशी माहिती श्रावण हर्डीकर यांनी दिली.
कचरा आणि रस्त्यावर थुंकणे, तसेच धुम्रपान या तीन विषयावर नागरिकांनी बोट ठेवले. ९४ टक्के नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास तयार असल्याचे मत नोंदविले. ९१ टक्के नागरिकांनी ओला व वाळल्या कचऱ्याची माहिती असल्याचे सांगितले. ९२ टक्के नागरिकांनी उघड्यावर शौच व लघवी करणार नाही असे सांगितले. ८२ टक्के नागरिकांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रतिदिन १ रुपया शुल्क देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती हर्डीकर यांनी दिली. स्मार्ट सिटी अभियानाचा पहिला व दुसऱ्या टप्पा (अ) ला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. पहिल्या टप्प्यात स्वच्छतेला तर दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता कशी असावी. तसेच अस्वच्छतेच्या कारणांचा शोध घेण्यात आला. याला शहरातील दहा झोन मधील ६४३६ नागरिकांनी प्रतिसाद दिला. नागरिकांनी अस्वच्छतेची कारणे सांगितली.(प्रतिनिधी)