महाराष्ट्रात सर्वाधिक जीवनदाते
By Admin | Updated: May 16, 2014 00:46 IST2014-05-16T00:46:17+5:302014-05-16T00:46:17+5:30
रक्तदान हेच जीवनदान म्हटल्या जाते. हे पुण्यकर्म करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या चार वर्षांंपासून गरजेपेक्षा रक्ताचे संकलन दीड ते दोन लाख युनिटने जास्त होत आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक जीवनदाते
नागपूर : रक्तदान हेच जीवनदान म्हटल्या जाते. हे पुण्यकर्म करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या चार वर्षांंपासून गरजेपेक्षा रक्ताचे संकलन दीड ते दोन लाख युनिटने जास्त होत आहे. वाढलेले आजार, अपघातामुळे रुग्णांना, जखमींना रुक्ताची गरज असते. थॅलेसिमिया, सिकलसेल, ब्लड कॅन्सरचा आजार झालेल्या रुग्णांना तर नियमित रक्ताची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात रक्त संकलन सर्वाधिक जास्त होत असेल तर महाराष्ट्रासाठी ही गौरवाची बाब आहे. राज्याला दरवर्षी १0 ते १२ लाख युनिट रक्ताची गरज भासते, असे महाराष्ट्र रक्त संक्रमण परिषदेचा अहवाल आहे. रक्ताची गरज भागविण्यासाठी शासकीय रुग्णालये, स्वयंसेवी संस्था, रक्तपेढय़ा रक्तदान शिबिर घेऊन रक्त संकलन करतात. राज्यात जवळपास ३00 च्यावर रक्तपेढय़ा आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत मोठय़ा शहरात रक्ताची गरज अधिक असते. विशेष म्हणजे ३५ दिवसांत संकलन केलेल्या रक्ताचा वापर करावा लागतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रक्तातील वेगवेगळे घटक काढून वापरात आणले जातात. गरजेपेक्षा जास्त रक्त संकलन होणे महाराष्ट्रासाठी भूषणावह असले तरी, खाजगी रक्तपेढय़ांच्या माध्यमातून रक्ताचा व्यवसाय होत आहे. यात गरीब मात्र भरडल्या जात आहे. त्यांच्या या समस्येकडे लक्ष द्यायला कुणीच पुढे सरसावत नाही. परिणामी, रक्ताअभावी अनेकांचे जीव जात आहेत. रक्ताच्या उपलब्धतेसाठी आता स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात देणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)