मोहनवीणेच्या स्वरांनी सजलेली सुरेल पहाट
By Admin | Updated: June 9, 2014 01:22 IST2014-06-09T01:22:30+5:302014-06-09T01:22:30+5:30
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने ब्रह्मनाद या मंगलमयी सुरेल पहाट संगीताच्या साक्षीने करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात आज सुप्रसिद्ध मोहनवीणावादक पंडित विश्वमोहन भट

मोहनवीणेच्या स्वरांनी सजलेली सुरेल पहाट
ब्रह्मनाद : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे आयोजन
नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने ब्रह्मनाद या मंगलमयी सुरेल पहाट संगीताच्या साक्षीने करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात आज सुप्रसिद्ध मोहनवीणावादक पंडित विश्वमोहन भट यांच्या वादनाचे आयोजन करण्यात आले. सकाळची प्रसन्न वेळ आणि पंडितजींच्या मोहनवीणेने छेडलेल्या सुरेल स्वरांनी नागपूरकरांचा रविवार सुरेल केला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ६ वाजता विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. त्यांनी पं. विश्वमोहन भट आणि महाराष्ट्र गौरवप्राप्त अरविंदकुमार यांचे स्वागत केले. याप्रसंगी केंद्र संचालक डॉ. पीयूष कुमार, वेकोलीचे मुख्य संचालक दिनेशचंद्र गर्ग, रमेश बोरकुटे आणि शेफ विष्णू मनोहर प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्राच्या निसर्गरम्य मोकळ्या परिसरात सकाळी ६ वाजता ब्रह्मनाद कार्यक्रमात पं. विश्वमोहन भट यांनी मोहनवीणा छेडली आणि सारे वातावरण संगीताच्या जादुई स्वरांनी भारले गेले. त्यांनी कार्यक्रमाचा प्रारंभ नटभैरव रागाने केला. भैरवचे विविध प्रकार, त्रिताल, सोळा मात्रा, बारा मात्रांच्या पुढे ताल पकडणे, मुर्की, खटका, सुजलाम सुफलाम मलयज शितलाम आदी हृदयस्पश्री स्वर त्यांनी मोहनवीणेतून काढले. यात पक्ष्यांचे स्वर आणि माणसांच्या भावभावनांची अभिव्यक्ती त्यांनी स्वरांतून केली. झाला सादर करून त्यांनी रसिकांना जिंकले आणि वादनाचा समारोप केला. कार्यक्रमाचे संचालन व आभार श्वेता शेलगावकर यांनी केले. याप्रसंगी पं. विश्वमोहन भट म्हणाले, जगाच्या कानाकोपर्यात संगीतप्रेमी आहेत. ही किमया केवळ संगीताच्या सात स्वरांची आहे. हे स्वरच जगाला एकत्रित आणू शकतात. ही शक्ती संगीतात आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
ला.ला..ला..ला.., आय लव्ह इंडिया
अमेरिके च्या इरिक क्लॅप्टन गिटारवादनाचा महोत्सव आयोजित करतात. जगातील ५0 हजार लोकांमध्ये त्यांनी मलाही या महोत्सवासाठी आमंत्रण दिले. मी तेथे गेलो. आपलही काही वेगळं अस्तित्व त्यांना दाखवावे म्हणून मी एक स्वर छेडला. ला.ला..ला..ला.., आय लव्ह इंडिया..अन् त्या ५0 हजार लोकांच्या ओठावर ही धून कायम राहिली. त्या लोकांनी सुरात सूर मिसळून या धूनचे कौतुक केले. यावेळी पंडितजींनी ती धूनही सादर केली. रसिकांनीही त्यांना प्रतिसाद देत सामूहिक गायन केले.