आयएसआय मार्कचा दुरुपयोग
By Admin | Updated: June 14, 2014 02:58 IST2014-06-14T02:58:41+5:302014-06-14T02:58:41+5:30
वस्तूचा दर्जा व सुरक्षितता निश्चित करण्यासाठी मानके वापरली जातात.

आयएसआय मार्कचा दुरुपयोग
नागपूर : वस्तूचा दर्जा व सुरक्षितता निश्चित करण्यासाठी मानके वापरली जातात. वस्तूवर मानके असल्यास ती वस्तू दर्जेदार मानण्यात येते. कारण ही मानके भारत
सरकारच्या भारतीय मानक ब्युरोकडून लावली जातात. त्यालाच आयएसआय मार्क म्हणतात. मात्र, या मानकांचाही गैरवापर उघडपणे होऊ लागला आहे. ‘आयएसआय’
मार्कचा नकली लोगो लावून उत्पादकांनी उत्पादित केलेल्या वस्तू बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध आहे. आयएसआय मानकाचा दुरुपयोग करून ग्राहकांना फसवित
असलेल्या विदर्भातील २५ उत्पादकांवर विविध कोर्टात केसेस सुरू आहे.
वस्तूच्या उत्पादन प्रणालीत अनेक ठिकाणी मानकांचा उपयोग करण्यात येतो. ही मानके विविध देशामध्ये त्यांची गरज आणि अभ्यासानुसार, अनुभवातून तयार होतात.
ग्राहकांसाठी नेहमीच सुरक्षित ठरतील अशी उत्पादने बाजारात आली पाहिजेत. त्यासाठी जी व्यवस्था उपलब्ध आहे, जी यंत्रणा कार्यरत आहे, तिचे नाव भारतीय मानक ब्युरो
आहे. केंद्र सरकारने आयएसआय अंतर्गत ९० उत्पादनांचा समावेश केला आहे. आयएसआय मानांकनाशिवाय उत्पादन विकता येत नाही. आयएसआय मानांकनाशिवाय
विक्री करताना जर आढळल्यास, उत्पादनाला जप्त करून, उत्पादकावर ५० हजारापर्यंत दंडात्मक कारवाई व ६ महिन्यांची कैदही होऊ शकते. असे असतानाही भारतीय
मानक ब्युरोक डून कुठलाही परवाना न घेता, आयएसआय मार्क लावून उत्पादनाची विक्री करणारे मोठ्या प्रमाणात आढळतात. ब्युरोचे विदर्भातील मुख्यालय असलेल्या
नागपूर शहर कार्यालयाने गेल्या काही वर्षात सिमेंट, पीव्हीसी पाईप, मोटारपंप, केबल, एलपीजी, थ्रेशर, प्लायवृड व पाणी उत्पादकांवर कारवाया केल्या आहेत.
आयएसआयचा सर्वाधिक दुरुपयोग पाण्याच्या विक्रीत होत आहे. संपूर्ण विदर्भ कार्यक्षेत्र असलेल्या नागपुरातील ब्युरोच्या कार्यालयात केवळ ४ अधिकारी आहे. त्यांनाच
कारवाई करा, परवाना असलेल्या आस्थापनेला भेटी द्या, नोंदणीसाठी अर्ज येणाऱ्या आस्थापनाची संपूर्ण तपासणी करा, प्रत्येक पेशीवर कोर्टात हजर रहा, अशा प्रकारची
भरपूर कामे आहेत. त्यामुळे बनावट आयएसआय मार्क लावून उत्पादनाची विक्री करणाऱ्यावर अंकुश लावणे कठीण जात आहे. विदर्भात भारतीय मानक ब्युरोचा परवाना
मिळविलेले ३८० उत्पादक आहेत. त्यापैकी दरवर्षी २० ते २५ उत्पादकांची मानके रद्द होतात. अधिकृत परवानाधारकाकडे वर्षातून दोन वेळा भेट देण्यात येते. (प्रतिनिधी)