रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष : डोक्याला गंभीर दुखापत होण्याची शक्यतानागपूर : प्लॅटफार्म क्रमांक ४-५ वर जाण्यासाठी खाली उतरत असलेल्या आणि गुळगुळीत झालेल्या रँपवरून मंगळवारी सायंकाळी अनेक पुरुष आणि महिला प्रवासी घसरून पडल्या. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी ही बाब रेल्वे अधिकाऱ्यांच्या कानावर टाकूनही सायंकाळपर्यंत कुठलीच उपायययोजना न करण्यात आल्यामुळे प्रवाशांच्या घसरण्याचे सत्र रात्री उशिरापर्यंत सुरू होते.नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक ४-५ वर जाण्यासाठी खाली उतरण्यासाठी रँपची सुविधा रेल्वे प्रशासनाने करून दिलेली आहे. परंतु रँपवर लावण्यात आलेली टाईल गुळगुळीत झाल्यामुळे यावरून अनेक प्रवासी घसरून खाली पडत आहेत. पूर्वेकडील भागातून आणि पश्चिमेकडून प्लॅटफार्म क्रमांक ४-५ वर जाण्यासाठी प्रवासी या रँपवरून खाली उतरतात. अनेकदा गाडी सुटण्याची वेळ झाल्यामुळे काही प्रवासी गडबडीत रँपवरून खाली उतरतात. परंतु गुळगुळीत झालेल्या या रँपवरून अनेक प्रवासी खाली पडत होते. यात काही ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ महिलांचाही समावेश होता. सायंकाळी ६ वाजता अनेक प्रवासी या रँपवरून पडले. त्या ठिकाणी उपस्थित रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी तातडीने ही माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पाच मिनिटासाठी आपला एक कर्मचारी घटनास्थळी पाठविला. परंतु त्यानेही हा रँप वाहतुकीसाठी बंद न करता तेथून निघून गेला. सायंकाळी उशिरापर्यंत प्रवाशांचे घसरून पडण्याचे सत्र सुरू होते. त्यामुळे रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेच्या बाबतीत किती दक्ष आहे, याची प्रचिती आली. एखाद्या प्रसंगी गडबडीत गाडी पकडण्याच्या उद्देशाने डोक्याच्या भागावर एखादा प्रवासी पडल्यास त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
रॅम्पवरून घसरून पडताहेत प्रवासी
By admin | Updated: June 11, 2014 01:33 IST