मेट्रो सौर ऊर्जेवर धावणार
By Admin | Updated: March 23, 2015 02:33 IST2015-03-23T02:33:55+5:302015-03-23T02:33:55+5:30
नागपूर मेट्रो रेल्वे हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या सरस आणि देशातील अन्य मेट्रो रेल्वेच्या तुलनेत अद्ययावत राहणार असून पारंपरिक सौर ऊर्जेवर धावणार...

मेट्रो सौर ऊर्जेवर धावणार
नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या सरस आणि देशातील अन्य मेट्रो रेल्वेच्या तुलनेत अद्ययावत राहणार असून पारंपरिक सौर ऊर्जेवर धावणार असल्याचा विश्वास नागपूूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
कंपनीकडे ४९१ कोटी उपलब्ध
मेट्रो रेल्वेचे काम सुरू करण्यासाठी कंपनीकडे ४९१ कोटींचा निधी उपलब्ध आहे. केंद्राने १९८ कोटी, राज्याचे १४३ कोटी आणि नासुप्रने १५० कोटी रुपये दिले आहेत. लागेल तेवढा निधी कंपनीला टप्प्याटप्याने उपलब्ध होणार आहे. तांत्रिकदृष्ट्या श्रेष्ठ मेट्रो रेल्वेत लहानांपासून वरिष्ठांना आरामदायक प्रवास करता येईल.
एएफडीचा १५०० कोटींचा कर्जपुरवठा
प्रकल्पासाठी ४५२१ कोटी कर्जस्वरुपात उभे करण्यात येणार आहे. फ्रान्स येथील एएफडी कंपनी १५०० कोटींचा (२०० दशलक्ष युरो) कर्ज पुरवठा करणार कंपनीची चमू २६ मार्च रोजी नागपुरात येत असून प्रकल्पाची पाहणी करून कर्जाचे निर्धारण करतील. तसे पाहता हे कर्ज केंद्र सरकारला मिळणार आहे. याशिवाय युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेची कर्ज देण्याची शक्यता आहे. ही चमू पुढील वर्षी भारतात येणार आहे. सध्या कंपनीकडे राज्याचे १९८ कोटी, केंद्राचे १४३ कोटी आणि नासुप्रचे १५० कोटी असे एकूण ४९१ कोटी रुपये आहेत.
सल्लागार कंत्राटदारांची दोन आठवड्यात नियुक्त
दोन आठवड्यात सल्लागार कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जगात २०० तर देशात १० ते १२ मेट्रो रेल्वे प्रकल्प आहेत. अनेकांचे सहकार्य घेताना हा प्रकल्प अधिक मजबूत आणि अद्ययावत तसेच जनतेसाठी उपयोगी, आरामदायक आणि सुविधायुक्त राहील. मेट्रो रेल्वे माझी गरज पूर्ण करण्यासाठीच असे जनतेला वाटेल.
सौर ऊर्जेचा वापर
नागपुरातील वातावरणाचा विचार केल्यास सौर ऊर्जा अधिक फायदेशीर ठरणार आहे. मेट्रो रेल्वे चालविण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग होईल. या क्षेत्रातील नामांकित कंपन्या जुळत आहेत. हा प्रकल्प बजेटमध्ये आणि वेळेत पूर्ण होईल.
४०० कर्मचाऱ्यांची गरज
प्रकल्पाला गती देण्यासाठी लवकरच अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी ४०० लोकांची गरज असली तरीही सध्या ५० जणांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मध्य रेल्वे, दमपू रेल्वे, मनपा, नासुप्र, सिंचन विभाग, खाजगी कंपन्या, निवृत्त अधिकारी आणि अनेक विभागातील अधिकाऱ्यासंह रेल्वेचे अधिकारी प्रतिनियुक्तीवर कंपनीत येणार आहे. प्रकिया १० एप्रिलपर्यंत सुरू राहील. प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल, तेव्हा हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
भारतीय बनावटीची उपकरणे
प्रकल्पाला लागणारी उपकरणे भारतीय बनावटीची राहतील. आंध्रप्रदेश, कनार्टक आणि गुजरात येथील कारखान्यातील कोच आणि वाहतुकीसाठी फ्रान्स किंवा जर्मनी देशातील सीबीटीसी यंत्रणा राहणार आहे. त्यामुळे जास्त गाड्या चालविता येतील. बांधकाम दिवसरात्र सुरू राहणार आहे. यासाठी ओव्हरहेड क्रेन राहणार आहे.
३.५ हेक्टर जागेचे लवकरच हस्तांतरण
३८.२१५ कि़मी.मध्ये ३६ थांबा असलेल्या या प्रकल्पासाठी आणखी ३.५ हेक्टर जागा ताब्यात घ्यायची आहे. त्यासाठी ८० जागांवर मार्किंग करण्यात आले आहे. यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविली आहे. लवकरच क्लिअरन्स मिळेल, अशी अपेक्षा बृजेश दीक्षित यांनी व्यक्त केली.