ग्रामगीतेत जीवनाचा अर्थ
By Admin | Updated: August 10, 2014 01:28 IST2014-08-10T01:28:22+5:302014-08-10T01:28:22+5:30
आजच्या विज्ञान युगातही अनेक चुकीच्या समजुतीवर विश्वास ठेवला जातो. पोथ्या चमत्काराने भरल्या आहेत. मात्र संतसाहित्यातून मनुष्याला जगण्याचा मार्ग मिळतो व ग्रामगीतेत जीवनाचा अर्थ सापडतो,

ग्रामगीतेत जीवनाचा अर्थ
अंनिसची रौप्य वर्ष पूर्ती : ज्ञानेश्वर रक्षक यांचे प्रतिपादन
नागपूर : आजच्या विज्ञान युगातही अनेक चुकीच्या समजुतीवर विश्वास ठेवला जातो. पोथ्या चमत्काराने भरल्या आहेत. मात्र संतसाहित्यातून मनुष्याला जगण्याचा मार्ग मिळतो व ग्रामगीतेत जीवनाचा अर्थ सापडतो, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रौप्य वर्ष पूर्तीनिमित्त शनिवारी ‘विवेक जागृती संकल्प कुटुंब मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. सक्करदरा येथील सेवादल महिला विद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष संजय शेंडे होते. मंचावर डॉ. अशोक चोपडे, मधुकर धंदरे, अॅड. गंगाधर इंगळे, चंद्रकांत श्रीखंडे, डॉ. प्रवीण चरडे व युगल शेंडे उपस्थित होते.
रक्षक पुढे म्हणाले, संतांनी आयुष्यभर अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. एल्गार पुकारला. समाजाला मार्ग दाखविण्याचे काम केले आहे. मात्र आम्ही त्यांना पोथ्यांमध्ये बसविले. त्यांचे विचार कधीच डोक्यात भरले नाही. त्यामुळेच आज अंधश्रद्धेच्या आहारी जात आहे. अनेक जण झोपेतून उठताच भविष्य पाहण्यासाठी टीव्हीसमोर बसतात. मात्र त्या भविष्यात खरंच तत्थ आहे का, याचा कुणीच विचार करीत नाही. जर टीव्हीतील त्या पाखंडी माणसाला भविष्य कळले असते तर पुण्यात बॉम्बस्फोटच झाला नसता. त्यापूर्वीच त्या पाखंडी माणसाला माहिती कळली असते. परंतु असे कधीही होत नसून, ती अंधश्रद्धा असल्याचे ते म्हणाले.
डॉ. अशोक पावडे यांनी विद्यार्थ्यांना स्वत:ची ओळख निर्माण करून क्षमता वाढविण्याचे आवाहन केले; अन्यथा पुढील काळ फार कठीण राहणार असल्याचेही त्यांनी संकेत दिले. कार्यक्रमाचे संचालन युगल शेंडे यांनी केले. अॅड़ गंगाधर इंगळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)