प्रवाशांची गैरसोय : वेटिंग रूम झाल्या फुल्लनागपूर : दाट धुके पडल्यामुळे दिल्ली आणि इतर मार्गावरील रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. दरम्यान उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे या गाड्यांची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना रेल्वेस्थानकावर ताटकळत बसण्याची पाळी आली आहे.मागील तीन दिवसांपासून दाट धुके पडत असल्यामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. रेल्वेगाडीच्या लोकोपायलट आणि सहायक लोकोपायलटला समोरील सिग्नल दिसणे कठीण झाले आहे. सिग्नल दिसत नसल्यामुळे आणि सिग्नल तोडून पुढे गेल्यास नोकरीवर संकट येत असल्यामुळे अनेक रेल्वेगाड्या मंदगतीने चालविण्यात येत आहेत. दरम्यान रविवारी उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यात रेल्वेगाडी क्रमांक १२४१० हजरत निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस ८ तास, १२७२४ नवी दिल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस ९ तास, १२६१६ नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस ५.३० तास, १२६२२ नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस ४ तास, १८२३८ अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेस ५.३० तास, १२५९१ गोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस ५.१५ तास, १२७२२ हजरत निजामुद्दीन-विशाखापट्टणम दक्षिण एक्स्प्रेस ५ तास, १२२९६ पटना-बंगळुर संघमित्रा एक्स्प्रेस ४ तास, १२६५० हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्कक्रांती एक्स्प्रेस २.३० तास उशिराने धावत आहे. उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होत असून त्यांना रेल्वेस्थानकावर ताटकळत बसण्याची पाळी आली आहे. दरम्यान ३ तासापेक्षा अधिक विलंब असलेल्या गाडीच्या प्रवाशांना त्यांच्या तिकिटावर १०० टक्के परतावा देण्यात येत आहे. रेल्वेगाड्यांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वेस्थानकावरील वेटिंग रुमही फुल्ल झाल्याची स्थिती आहे. (प्रतिनिधी)
धुक्यामुळे अनेक रेल्वेगाड्या ‘लेट’
By admin | Updated: December 22, 2014 00:38 IST