२२ देशांमधील प्रमुख बौद्ध धम्मगुरू येणार
By Admin | Updated: September 13, 2014 02:39 IST2014-09-13T02:39:01+5:302014-09-13T02:39:01+5:30
देश विदेशातील अनेक बौद्ध भिक्खू आणि अनुयायी दीक्षाभूमीवर दरवर्षीच येत असतात. दरवर्षी यात वाढ होत आहे.

२२ देशांमधील प्रमुख बौद्ध धम्मगुरू येणार
नागपूर : देश विदेशातील अनेक बौद्ध भिक्खू आणि अनुयायी दीक्षाभूमीवर दरवर्षीच येत असतात. दरवर्षी यात वाढ होत आहे. परंतु दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तनाच्या मुख्य सोहळ्यासाठी २२ देशांमधील प्रमुख बौद्ध धम्मगुरु एकाचवेळी पहिल्यांदाच येणार आहे. यंदाचे हे विशेष आकर्षण राहणार असून धार्मिक कार्यक्रमांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
३ आॅक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर तयारीला सुरुवात झाली आहे.
विविध बौद्ध राष्ट्रांमधील भिक्खूगण आणि अनुयायी मागील काही वर्षांपासून नागपुरात सातत्याने येत आहेत. परंतु यंदा ते दीक्षाभूमीच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी राहणार आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या उपस्थितीमध्ये दीक्षाभूमीवर धम्म परिषदही आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे ही परिषद खऱ्या अर्थाने जागतिक धम्म परिषद राहणार आहे. (प्रतिनिधी)
महापौरांनी घेतला व्यवस्थेचा आढावा
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या विविध व्यवस्थेचा आढावा महापौर प्रवीण दटके यांनी शुक्रवारी घेतला. स्मारक समितीच्या मार्गदर्शनाखाली मनपातर्फे अस्थायी टॉयलेट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत सेवा, अग्निशमन सेवा, स्वच्छता आदी व्यवस्था करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. यावेळी महापौरांनी दीक्षाभूमी परिसराची पाहणी केली. तसेच मध्यवर्ती स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अस्थिकलशाचे दर्शन घेऊन तथागत गौतम बुद्धांना अभिवादन केले. स्मारक समितीतर्फे सदानंद फुलझेले यांनी महापौरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. समितीचे सदस्य विलास गजघाटे, विजय चिकाटे यांनी मनपा अधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी उपहापौर गणेश (मुन्ना) पोकुलवार, आयुक्त श्याम वर्धने, माजी महापौर आ. अनिल सोले, गोपाल बोहरे, रमेश सिंगारे, संदीप जोशी, बंडू राऊत, मुन्ना यादव, माजी उपमहापौर संदीप जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
भोजनदानाची व्यवस्था ठराविक ठिकाणी करावी
दीक्षाभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारी आंबेडकरी बौद्ध अनुयायी उपाशी राहू नयेत म्हणून शहरातील हजारो संघटना भोजनदानाची व्यवस्था करीत असतात. परंतु त्यात काही तारतम्य राहत नसल्याने अन्न वाया जाते. तसेच अनुयायांनाही त्रास होतो. तेव्हा भोजनदानाची व्यवस्था ठराविक जागेत करण्यात यावी, अशी विनंती मनपा आयुक्त श्याम वर्धने यांनी स्मारक समितीला केली. या ठिकाणी मनपाच्या दहाही झोनच्या सहायक आयुक्तांची ड्युटी लावण्यात येईल. या ठिकाणी मनपा २४ तास सेवा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.