नागपुरातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:07 IST2021-04-20T04:07:52+5:302021-04-20T04:07:52+5:30
नागपूर : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाने नागपुरातन सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या ३० एप्रिलपर्यंत बंद केल्या आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून ...

नागपुरातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या बंद
नागपूर : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाने नागपुरातन सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या ३० एप्रिलपर्यंत बंद केल्या आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून मध्य प्रदेश व हैदराबादला जाणाऱ्या बसेस यापूर्वीच बंद करण्यात आल्या आहेत.
गणेशपेठ बस आगराचे व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे, धुळे, औरंगाबाद, अकाेला, राजनांदगाव (छत्तीसगड), वाशीम या शहरात जाणाऱ्या बसेस ३० एप्रिलपर्यंत धावणार नाहीत. यामुळे या आगाराचे उत्पन्न खालावले आहे. दोन महिन्यापूर्वी वाहतूक पूर्णक्षमतेने सुरू असताना या आगारामधून सुटणाऱ्या बसेस रोज १७ हजार किलोमीटर अंतर धावायच्या. आता हा आकडा ७ हजार किलोमीटरवर आला आहे.
लांब पल्ल्याच्या बसेस बंद झाल्याने या आगाराला रोजचे सुमारे तीन लाख रुपयाचे नुकसान सहन करावे लागत आहे. दरवर्षी एप्रिल, मे, जून हे महिने लग्नसराईचे असल्याने बसमध्ये प्रचंड गर्दी असायची. मुलांच्या शाळा संपल्याने परगावी जाणारे, देवदर्शन व पर्यटनाला जाणाऱ्या प्रवाशांचीही मोठी गर्दी असायची. मात्र कोरोना संक्रमणामुळे प्रवास मर्यादित झाला आहे. प्रवासी मिळत नसल्याने लांब पल्ल्याच्या बसेस बंद करण्याचा आणि फेऱ्या कमी करण्याचा निर्णय महामंडळाला घ्यावा लागत आहे. गणेशपेठ आगारातून लांब अंतराच्या ३५ बसेस धावायच्या. कमी अंतराच्या बसफेऱ्याही आता प्रवाशांच्या प्रतिसादानुसार सोडल्या जात आहेत.