ई-रिक्षासाठी स्थानिक भाषेची अट
By Admin | Updated: August 10, 2016 02:36 IST2016-08-10T02:36:35+5:302016-08-10T02:36:35+5:30
बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा अर्थात ‘ई-रिक्षा’ व ‘ई-आर्ट’ या संवर्गाला मोटार वाहन नियमात समाविष्ट करून शासनाने मान्यता दिली आहे.

ई-रिक्षासाठी स्थानिक भाषेची अट
पाचच जिल्ह्यात मिळणार परवाने : वाहनाच्या नियमनाबाबत शासनाच्या १९ शर्ती
नागपूर : बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा अर्थात ‘ई-रिक्षा’ व ‘ई-आर्ट’ या संवर्गाला मोटार वाहन नियमात समाविष्ट करून शासनाने मान्यता दिली आहे. परंतु पहिल्या टप्प्यात राज्यातील पाचच जिल्ह्यात ‘ई-रिक्षा’चे परवाने मिळणार आहेत. यात नागपूरसह लातूर, अमरावती, बुलडाणा, अकोला आणि वर्धा आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या वाहनाच्या नियमनाबाबत स्थानिक भाषेच्या अटीसह तब्बल १९ शर्ती व अटींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे याला किती प्रतिसाद मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ई-रिक्षासाठी जोपर्यंत स्वतंत्र कायदा तयार होत नाही, वाहन तपासणी करणाऱ्या ‘एआरएआय’ या संस्थेकडून या रिक्षाची चाचणी होत नाही व योग्यता प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत ई-रिक्षावर बंदी घालण्यात आली होती. असे असताना राज्यात सर्वत्र अवैधरीत्या ई-रिक्षा धावत होत्या.
ई-रिक्षा संदर्भात केंद्र शासनाच्या अधिसूचना विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने या वाहनांच्या नियमनाबाबत नुकतेच धोरण ठरविले. मोटार वाहन कायदा १९८८च्या कलम ७४ (१) मधील तरतुदीनुसार राज्यातील नागपूरसह पाच जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी ई-रिक्षा संदर्भातील परवाने देण्याचा निर्णय घेतला.
हे परवाने मिळविण्यासाठी अर्जदाराला १९ अटी व शर्तीचे पालन करावे लागणार आहे.
यात अर्जदाराकडे ई-रिक्षा चालविण्याचा वैध परवाना व सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याचे बॅज आणि लॅमिनेटेड स्वरुपात ओळखपत्र असण्याची पहिली अट आहे.
दुसरी अट, अर्जदारास स्थानिक भाषेचे ज्ञान व परवाना क्षेत्रातील स्थळाची माहिती असणे आवश्यक असल्याची आहे. या शिवाय गेल्या वर्षभरामध्ये पोलीस विभागात दखलपात्र गुन्ह्याची नोंद नसावी, शासन किंवा निमशासकीय सेवेत तो नसावा, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारच्या वाहनाचा परवाना नसावा, ई-रिक्षाचा परवाना मिळाल्यानंतर वाहनात हेल्पलाईन क्रमांक व वाहनचालकाची माहिती प्रदर्शित करणे बंधनकारक असेल, आसनक्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करता येणार नाही, प्राधिकरणाने विनिर्दिष्ट केलेले क्षेत्र, मार्ग किंवा भागतच ई-रिक्षा चालविण्यास मान्यता असणार आहे, प्रथमोपचार पेटी व अग्निशमन यंत्र ठेवणे अनिवार्य असणार आहे, ई-रिक्षा हे वाहन तीनचाकी आॅटोरिक्षा वाहनाशी संलग्न करू नये त्याची नोंदणी परिवहन संवर्गात करावी, अशाही सूचना शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)