कोरोनासोबत जगायचे, लसीकरण धोक्याचे, हे सोशल माध्यमांचे खूळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST2021-04-07T04:08:11+5:302021-04-07T04:08:11+5:30
- भ्रामक संवादांचे षडयंत्र : प्रत्येकानेच माध्यम साक्षरतेबाबत जागरूक होणे महत्त्वाचे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मानवी आरोग्यासाठी व्यस्तता ...

कोरोनासोबत जगायचे, लसीकरण धोक्याचे, हे सोशल माध्यमांचे खूळ!
- भ्रामक संवादांचे षडयंत्र : प्रत्येकानेच माध्यम साक्षरतेबाबत जागरूक होणे महत्त्वाचे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानवी आरोग्यासाठी व्यस्तता ही कायम चांगली बाब असून, त्यात स्वत:साठीची उसंत असते. मात्र, सोशल मीडियाने त्या उसंतीवरही घाला घातला आणि व्यक्ती व्यावहारिक आयुष्यातील व्यस्ततेतही रिकामटेकडा असल्यासारखेच वागायला लागला आहे. त्याचे पर्यवसान नको त्या तणावाला बळी पडण्यावर झाले आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात तर माध्यमांवर किंतु-परंतुच्या विश्लेषणांचा भडिमार झाल्याने, प्रत्येक व्यक्ती स्वत:कडे संशयाच्या नजरेने बघायला लागला आहे. जणू प्रत्येकच जण आजारी असल्याचा भास निर्माण झाला आहे. कोरोना कधीच संपणार नाही, संक्रमणासोबतच जगण्याची सवय पाडावी लागेल, भारतीय उपचार बिनकामाचे, लसीकरण धोक्याचे आदी अशा संदेशांनी सुशिक्षितही हैराण झाले आहेत. अशा संदेशांचा वापर जगपातळीवर भारतीय मानसशास्त्राला नामोहरम करण्यासाठीचे षडयंत्र म्हणून केला जात असल्याचे मत सोशल माध्यमांचे विश्लेषक व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रत्येकानेच माध्यम साक्षरतेबाबत जागरूक होण्याचे आवाहन तज्ज्ञ विश्लेषकांनी केले आहे.
---------------------
माध्यमांतून मानसशास्त्राशी होत असलेला खेळ
* सोशल मीडिया हा एक मोठा उद्योग आहे. दररोज वेगवेगळ्या माध्यमांतून दररोज ५०० कोटी संदेश प्रसारित केले जातात.
* संदेशनिर्मिती करण्यासाठी आणि ते प्रसारित करण्यासाठी गलेलठ्ठ पगार दिला जातो.
* टार्गेटेट एरियावर जसे भारत, हा पगार आणखी भक्कम असतो.
* उपभोक्ता जितका भ्रमित होईल तितकाच लाभ माध्यमांना होतो.
* उपभोक्त्याचा इंटरेस्ट तसा, तसे पोस्ट क्रिएट केले जातात. उदा. धार्मिक, सेक्स, जातीय तेढ, कोरोना संक्रमण आदी.
* संदेशांचा भडिमार होत असल्याने खोट्या गोष्टी खऱ्या आणि खऱ्या गोष्टी खोट्या समजावण्याचा प्रयत्न केला जातो.
* वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रॉडक्ट, कंपन्यांना उपभोक्त्याच्या भ्रामकतेचा लाभ होतो.
------------------
सोशल माध्यमांच्या अराजकतेपासून वाचण्याचे उपाय
* सोशल मीडिया एज्युकेशनची गरज. अनोळखी व्यक्तीच्या संदेशावर प्रतिसाद का द्यावा, हा प्रश्न निर्माण होणे गरजेचे.
* शालेय जीवनातच इतर विषयांसोबतच सोशल मीडिया एज्युकेशनचा विषय अभ्यासात येणे गरजेचे.
* नो डिलिट, नो रिस्पॉन्सची सवय महत्त्वाची.
* पारंपरिक माध्यमांवरच जसे वृत्तपत्रे, दूरदर्शन आणि तज्ज्ञांवरच विश्वास ठेवणे महत्त्वाचे.
* फॉरेन फोबिया अर्थात जागतिक लोकांवरच विश्वास ठेवणे चुकीचे. तुमच्या देशाची मानसिकता, आरोग्याची स्थिती त्यांना नाही, ही बाब समजून घ्यावी.
* सत्य ओळखण्याची क्षमता निर्माण करणे, प्रश्न उपस्थित होण्याची सवय लावणे महत्त्वाचे.
----------------------
पारंपरिक ते न्यू मीडिया ट्रान्झेक्शन अचानक झालेले आहे. त्यामुळे सोशल मीडियापासून नागरिकांना वाचविण्याची सर्वात मोठी जबाबदारी पारंपरिक माध्यमांचीच आहे. नैराश्य हा आजार नाही तर ते एक सिम्प्टम हे समजून घेणे महत्त्वाचे. त्यासाठी माध्यम साक्षरतेची जाणीव शिक्षणाच्या पातळीवरच विकसित करावी लागणार आहे.
- डॉ. मोईज हक, विभाग प्रमुख, जनसंवाद विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विश्वविद्यालय
----------------
सोशल मीडिया म्हणजे प्रोटोगोनिस्ट अर्थात सकारात्मक व ॲण्टोगोनिस्ट अर्थात नकारात्मकतेचे द्वंद्व आहे. ऐकिवात गोष्टींवर विश्वास ठेवण्याचे प्रमाण मोठे आहे. युरोप, अमेरिकेत सोशल माध्यमांवरील अवाजवी संदेशांना नाही म्हणण्याची प्रक्रिया मोठी आहे. त्या तुलनेत भारतात ही प्रक्रिया अजून रूढ व्हायची आहे. या संदेशांचे सत्यापित स्रोत शोधण्याची वृत्ती वाढीस जेव्हा लागेल, तेव्हा भारतीय माणूस सोशल माध्यमांना बळी पडणार नाही.
- डॉ. धर्मेश धवणकर, प्राध्यापक, जनसंवाद विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विश्वविद्यालय
.....................