अंधाराशी युद्ध करणारे ‘लाईनमन’
By Admin | Updated: June 12, 2014 01:14 IST2014-06-12T01:14:54+5:302014-06-12T01:14:54+5:30
बुधवारचा दिवस. शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित. देखभाल-दुरुस्ती सुरू असल्याने दुपारी १ वाजतानंतर टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत होईल, असे वीज वितरण कंपनीकडून मिळणारे उत्तर.

अंधाराशी युद्ध करणारे ‘लाईनमन’
प्रतिकूल स्थितीत काम : सायकलवर ‘पेट्रोलिंग’
कमल शर्मा - नागपूर
बुधवारचा दिवस. शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित. देखभाल-दुरुस्ती सुरू असल्याने दुपारी १ वाजतानंतर टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत होईल, असे वीज वितरण कंपनीकडून मिळणारे उत्तर. महावितरण या दिवशी नेमके करते तरी काय, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत चमू’ थेट दुरुस्तीच्या ठिकाणी पोहोचली. तेथे ‘लाईनमन च्या कामाच महत्त्व कळलं. स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांचे अंधाराशी युद्ध सुरु होते.
वयाची पन्नासी पार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सफाईने खांबावर चढताना आणि उतरताना पाहिल्यावर त्यांच्याशी चर्चा केल्यावर तेच महावितरणचा आधारस्तंभ असल्याचे स्पष्ट झाले.
विजेचे खांब लावतानाच ग्राहकांच्या घरी २४ तास वीजपुरवठा होतो किंवा नाही याची खबरदारी घेतानाच पुरवठा खंडित झाल्यास त्यामागची कारणे शोधून तो सुरळीत करण्याची जबाबदारीही या कर्मचाऱ्यांचीच असते. कधी सायकलवर तर कधी दुचाकीवर ते त्यांच्या भागात ‘पेट्रोलिंग’ करतात. अनेक वेळा जीव धोक्यात घालून त्यांना खांबावर चढावे लागते. महावितरणमधील ६० टक्के ‘लाईनमन’ मधुमेहाने पीडित आहेत. बहुतांश जणांना अर्धांगवायूचा झटका आला आहे.
कामाची वेळ अनिश्चित
बेसा पॉवर हाऊसमध्ये काम सुरू होते. तेथे ‘लोकमत चमू’ पोहोचली. तेथे १२ पेक्षा अधिक कर्मचारी फिडर दुरुस्तीचे काम करीत होते. सेवानिवृत्तीच्या जवळ पोहोचलेले उमाकांत कोलते हे यापैकीच एक. ते म्हणाले की, कामाची वेळ निश्चित नाही. कामाची वेळ जरी आठ तास असली तरी, आपात्कालीन स्थितीत कधी १२ तर कधी १६ तास काम करावे लागते. उशिरा रात्री कॉल आल्यावर १५ मिनिटात संबंधित ठिकाणी पोहोचावे लागते. कुटुंबीयांनाही याची सवय झाली आहे.
अपघाताची चिंता नाही
दुरुस्तीचे काम करताना अनेक वेळा धोका संभवतो. विजेचा धक्काही बसतो. पण त्याची चिंता करत नाही. वीज पुरवठा सुरळीत करणे यालाच कर्मचाऱ्यांचे प्राधान्य असते, असे सदाशिव मानकर म्हणाले.
वीज ग्राहक आमचे कुटुंबीबेसा येथे काम करणारे प्रशांत आकरे म्हणाले की, वीज ग्राहकांना आम्ही आमच्या कुटुंबातील सदस्यच मानतो. ते अंधारात राहू नये, असेच आमचे प्रयत्न असतात. विविध सोयी आणि सुविधांच्याबाबतीत आम्ही सरकारशी लढतो. पण ग्राहकांना सेवा देताना याचा विचार कधीच करीत नाही.