लोकमत न्ययूज नेटवर्क
नागपूर : मागील काही महिन्यांपासून ओबीसीच्या मुद्द्यांवर राज्यातील राजकारण तापले असून, ओबीसींच्या जनगणनेसाठी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. यातच आता भाजप नेते आ. गोपीचंद पडळकर यांनीही ओबीसी जनगणना व्हावी, असे स्पष्ट करीत त्यासाठी मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे शनिवारी येथे पत्रपरिषदेत जाहीर केले.
ओबीसींची जनगणना न झाल्यामुळे त्यांना अल्प प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ मिळतो. तर भटक्या जमातींची दयनीय परिस्थिती आहे. तत्कालिन भाजप सरकारने ओबीसीसाठी स्थापन केलेल्या महाज्योतीकडे सध्या दुर्लक्ष होत आहे. सारथीला एका दिवसांत निधी दिला जात असताना महाज्योतीबाबत आकस का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ओबीसीमध्ये ३४६ जाती असताना राज्य शासनाने केवळ ८० कोटींचा निधी दिला. यातून समाजाचे काय हित साधले जाणार? तत्कालिन सरकारने महाज्योतीची स्थापना केल्यानंतर ३८० कोटींचा निधी जाहीर केला होता; परंतु सत्ताबदल झाल्यानंतर तो निधीही खर्च केला नाही. केवळ कागदावरच संस्थेचे अस्तित्व दिसून येते. राज्य सरकारने सारथी, बार्टीच्या धरतीवर महाज्योतीची स्थापना केली; परंतु निधी वाटपात आखडता हात घेतला. अधिवेशनात महाज्योतीला १० हजार कोटींची मागणी केली होती; परंतु राज्य सरकारची देण्याची ऐपत नसल्याने ५०० कोटी रुपये द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. सत्तेत बसलेल्या ओबीसी नेत्यांना निधी खेचून आणता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा व नंतर रस्त्यावर उतरावे, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणावरून ओबीसी समाजात भीतीचे वातावरण आहे. ती भीती दूर करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याची भूमिका त्यांनी मांडली. धनगराच्या मुद्द्यावर त्यांनी न्यायालयीन लढा सुरू असल्याचे सांगितले.
------------