विधिमंडळ सचिवालय आजपासून नागपुरात

By Admin | Updated: November 27, 2015 03:11 IST2015-11-27T03:11:32+5:302015-11-27T03:11:32+5:30

७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनासाठी जय्यत तयारी सुरू आहे. मुंबईतील विधिमंडळ सचिवालय शुकवार २७ नोव्हेंबर रोजी नागपुरात दाखल होत आहे.

Legislature secretariat has been organized in Nagpur from today | विधिमंडळ सचिवालय आजपासून नागपुरात

विधिमंडळ सचिवालय आजपासून नागपुरात

नागपूर : ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनासाठी जय्यत तयारी सुरू आहे. मुंबईतील विधिमंडळ सचिवालय शुकवार २७ नोव्हेंबर रोजी नागपुरात दाखल होत आहे.
अधिवेशनाची पूर्वतयारी म्हणून विधानभवन तसेच रविभवन परिसरात विविध कामांना सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मुंबईहून १५ ट्रक्ससह साहित्य नागपुरात दाखल होईल. अधिवेशनासाठी मुंबईतील ८० टक्के स्टाफ हा नागपुरात दाखल होतो. नागपुरात होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. राज्य सरकार नागपुरात येणार असल्याने तयारी जोरात सुरू आहे. अधिवेशन काळात सरकारच नागपुरात येत असल्याने विविध विभागांच्या फाईल्ससह महत्त्वाची कागदपत्रे नागपुरात आणली जातात. अधिवेशन ७ तारखेपासून सुरू होत असले तरी सचिवालय त्यापूर्वीच आपल्या कामकाजाला सुरुवात करते. २७ नोव्हेंबरपासून या कामकाजाला सुरुवात होईल. गुरुवारी कर्मचारी मुंबईहून रवाना झाले असल्याचे विधिमंडळातील सूत्रांनी सांगितले.
सचिवालयातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या व्यवस्थेची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. यादृष्टीने नागभवन कॉटेज व आमदार निवास तसेच १६० खोल्यांच्या गाळ्यांमध्ये पाणी, वीज व स्वच्छता आदी व्यवस्था करण्यात येत आहे. विधानभवनात नागपूर विधान मंडळ सचिवालय परिसर, विधान मंडळ सुरक्षा व्यवस्था, सचिवालय खानपान व्यवस्था, मंत्री व आमदार यांच्या निवासाची व्यवस्था केली जात आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या तयारीची रंगीत तालीम विधिमंडळाचे अधिकारी व संबंधित अधिकारी संयुक्तपणे अधिवेशन सुरू होण्याच्या एक आठवडा पूर्वी करणार आहेत. व्यवस्थेतील उणिवा पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Legislature secretariat has been organized in Nagpur from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.