ग्रामपंचायतीतूनच घडले नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:09 IST2021-01-03T04:09:48+5:302021-01-03T04:09:48+5:30

जितेंद्र ढवळे नागपूर : जिल्ह्यात १३० ग्राम पंचायतीची रणधुमाळी सुरु झाली आहे. १८ जानेवारी रोजी पुढील पाच वर्षासाठी गाव ...

The leadership came from the Gram Panchayat itself | ग्रामपंचायतीतूनच घडले नेतृत्व

ग्रामपंचायतीतूनच घडले नेतृत्व

जितेंद्र ढवळे

नागपूर : जिल्ह्यात १३० ग्राम पंचायतीची रणधुमाळी सुरु झाली आहे. १८ जानेवारी रोजी पुढील पाच वर्षासाठी गाव कारभारी ठरतील. पंचायत राज व्यवस्थेत ग्रा.पं.ला विशेष महत्त्व आहे. गावातूनच राज्य आणि देशपातळीवरील नेतृत्वाची जडणघडण झाल्याची अनेक उदाहरणे आहे. नागपूर जिल्ह्यातही ग्रा.प.सदस्य आणि सरपंचपदाचा मान भूषविणाऱ्यांनी राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात छाप सोडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची जडघडण झाली आहे. यात माजी मंत्री रणजित देशमुख, दिवंगत आ.सुनील शिंदे, दिवंगत आमदार आ. ला.वाघमारे, माजी आ. मुकुंदराव मानकर, माजी जि.प.अध्यक्ष रमेश मानकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. यासोबतच कामठी तालुक्यातील टेमसना येथील शेतकरी कुटुंबातील पुरुषोत्तम पंजाबराव शहाणे (पाटील)१९९५ मध्ये टेमसना ग्रा.पं.चे सरपंच झाले. यानंतर ते १९९८ मध्ये भूगाव पंचायत समिती गणातून विजयी झाले. यानंतर कामठी पंचायत समितीचे सभापती होण्याचा मान त्यांना मिळाला. २००० मध्ये वडोदा जि.प. सर्कल मधून विजयी झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होण्याची संधी त्यांना लाभली. ग्राम विकासात शहाणे यांचे योगदान मोठे आहे. तालुक्यातील आसोली येथील अनिल निधान २००५ मध्ये महालगाव आसोली गट ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून निवडून आले. यानंतर २००५ मध्ये आजनी गुमथळा जि.प. सर्कल म्हणून ते विजयी झाले. २०२० च्या जि.प.निवडणूक गुमथळा सर्कलमधून विजयी झालेले निधान सध्या जि.प.चे विरोधी पक्ष नेते आहेत.

अलीकडेच्या काळात कळमेश्वर तालुक्यातील सुसुंद्री या छोट्याशा गावात जन्मलेले श्रावण भिंगारे हे २००८ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले होते. तत्कालीन सरपंच नरेंद्र डोंगरे यांच्या अकाली निधनानंतर श्रावण भिंगारे यांच्याकडे सरपंचपदाची जबाबदारी आली. सध्या भिंगारे पंचायत समितीचे सभापती आहेत. तसेच उबाळी येथील नरेंद्र पालटकर यांनी २००२ ते २०११ पर्यंत सलग ९ वर्ष ग्राम पंचायतीचे सरपंचपद भूषविले. पंचायत समितीच्या उबाळी गणातून ते निवडून येत २०१२ ते २०१९ हा साडेसात वर्षे ते पं.स.चे उपसभापती राहिले आहे.

भिवापूरच्या सरपंच ते पंचायत समितीच्या सभापती या दोन्ही पदी आरूढ होत शहर व तालुक्याची सूत्रे कुंदा कंगाले यांनी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. भिवापूरला नगरपंचायतीचा दर्जा मिळण्यापूर्वी भिवापूर जिल्ह्यातील मोठ्या ग्रा.पं.पैकी एक होती. २००७ मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर कुंदा कंगाले यांना सरपंच पदाचा मान मिळाला. २००७ ते २०१२ पर्यंत त्या भिवापूरच्या सरपंच होत्या. त्यानंतर सन २०१२ मध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीत त्या भिवापूर गणातून विजयी झाल्या. २०१५ पर्यंत त्या भिवापूरच्या सभापती होत्या. मात्र तत्पूर्वीच २०१४ मध्ये भिवापूरला नगर पंचायतीचा दर्जा मिळाला. त्यामुळे पंचायत समितीचा भिवापूर गण रद्द झाला. सरपंच ते सभापती असा ८ वर्षाचा राजकीय प्रवास कंगाले यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला.

ग्रा.पं.सदस्य ते राज्यात मंत्री

रणजित देशमुख

ग्रा.पं.सदस्य ते राज्यात मंत्रिपद भूषविणारे रणजित देशमुख यांचा राजकीय प्रवास नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथून सुरु झाला. ते १९७२ मध्ये पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्यामधून पंचायत समिती सभापती निवडण्याची मुभा होती. १९७२-७७ या काळात ते नरखेड पंचायत समिती सभापती होते. १९७९ मध्ये जि.प.च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर ते जि.प.अध्यक्ष झाले. यानंतर १९८५-९५ या काळात ते सावनेर विधानसभा मतदार संघातून सदस्य होते. यादरम्यान १९८८ गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास विभागाचे राज्यमंत्री, १९९० जलसंधारण, गृहनिर्माण, आरोग्य, शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा , वित्त व नियोजन राज्यमंत्री होते. १९९३ ला राज्याचे ग्रामविकास, रोजगार हमी व जलस्रोत मंत्री होते. १९९८ विधान परिषद सदस्य व १९९९ ला कृषी व वस्त्रोद्योग मंत्री होते. ग्रामपंचायत पासून मिळालेल्या अनुभवामुळे त्यांचा प्रशासनावर वचक होता.

ग्रा.पं. सदस्य ते आमदार

सुनील शिंदे

सावरगाव येथे जन्मलेले दिवगंत माजी आमदार सुनील शिंदे यांचा राजकीय प्रवास ग्रामपंचायत सदस्य ते विधानसभा सदस्य असा राहिला आहे. ते १९६७-७० या काळात ग्रा.पं.सदस्य होते. १९७२-८३ या काळात जि.प.सदस्य, १९८० ते ८३ जि.प.सभापती, १९८५ ते ९५ विधानसभा सदस्य, १९८७ मध्ये रोजगार हमी योजनेचे अध्यक्ष अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. ग्राम विकासावर पकड असलेल्या शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात शेतकरी नेते म्हणून स्वतंत्र निर्माण ओळख केली होती.

नवेगावचे पहिले सरपंच झालेत आमदार

आ.ला.वाघमारे

नवेगाव साधू ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच ते उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार असा बहुमान कर्मवीर आ. ला. वाघमारे यांना जातो. सरपंच, आमदार आणि त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य असा वाघमारे यांच राजकीय प्रवास राहीला आहे. १५ डिसेंबर १९२१ ला आ. ला. वाघमारे यांचा जन्म उमरेड येथे झाला. १९४२ च्या चले जाव आंदोलनात सहभाग घेणारे वाघमारे यांनी इयत्ता दहावीपासून शाळा सोडली. उमरेड जनपदचे अध्यक्ष, उमरेड तालुका हरिजन सेवा संघाचे अध्यक्ष, भारत सेवक संघाचे संयोजक, नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव, भारत सरकारच्या मेंढी विकास परिषदेवर नियुक्ती आदी विविधांगी जबाबदाºया त्यांनी यथोचित सांभाळल्या. सन १९६२ ते १९६७ च्या कार्यकाळात नवेगाव साधू ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंच म्हणून त्यांनी धुरा सांभाळली. १९७२ ते १९७७ या काळात ते उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणूनही ते निवडून आले. मंडल आयोग व सामाजिक परिवर्तनसाठी सुद्धा त्यांचा लढा लक्षवेधी होता. १९७९ ते ८९ ते जि.प.सदस्यही होते. १९७२ दरम्यानच्या दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करताना त्यांनी उमरेड क्षेत्रात सिंचनासाठी भरीव योगदान दिले.

सरपंच ते आमदार,

मुकुंदराव मानकर

ग्रा.पं. सरपंच ते आमदारकीय पर्यंतचा टप्पा गाठणाऱ्यात काटोलचे माजी आमदार मुकुंदराव गोविंदराव मानकर हेही महत्वाचे नेते आहेत. तालुक्यातील दिग्रस भाऊसाहेब येथून १९६८ मध्ये त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून राजकीय कारकीर्द सुरु केली. आधी सरपंच नंतर पंचायत समिती स्वीकृत सदस्य आणि १९७८ मध्ये आमदार असा मानकर यांचा प्रवास राहीला आहे. ८१ वर्षीय मुकुंदराव यांना आजही ग्रामविकासाची आपुलकी आहे.

सरपंच ते जि.प.अध्यक्ष

रमेश मानकर

कळमेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र धापेवाडा येथील रमेश मानकर यांची राजकीय कारकीर्द ग्रामपंचायतीमधूनच घडली. १९८४ ते १९९३ या काळात ते धापेवाडा ग्रा.पं.चे सरपंच होते. १९९२ मध्ये ते पहिल्यांदा जि.प. सदस्य झाले. १९९९ मध्ये जि. प.निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवित विजय संपादन केला. त्यानंतर त्यांनी निवडणुका भाजपच्या उमेदवारीवर लढविल्या. १९९९ मध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद व २००७ मधे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मानकर यांनी भूषविले आहे.

-

गावाचा सरपंच ते राज्याचे कर्तृत्वान मुख्यमंत्री म्हणून आजही दिवंगत विलासराव देशमुख यांचे नाव गौरवाने घेतले जाते. ग्राम पंचायत नेतृत्वाच्या जडघडणीची विद्यामंदिर आहे. गावाच्या विकासासाठी झटणाऱ्यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात नेतृत्व केल्याची अनेक उदाहरणे आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ग्राम स्वराजाची संकल्पना पूर्णपणे वास्तवात साकारण्यासाठी आजवरच्या सर्वच सरकारने प्रयत्न केले आहेत. हे कार्य पुढेही सुरु राहणे आवश्यक आहे. यासोबतच ग्रा.पं.सदस्य, सरपंचांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी सरकारने विशेष पुढाकार घेण्याची गरज आहे.

- चंद्रपाल चौकसे

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटना

Web Title: The leadership came from the Gram Panchayat itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.