अंतिम निरोपही गटाराच्या साक्षीनेच द्यावा लागतो! ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST2021-02-05T04:59:29+5:302021-02-05T04:59:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अंबाझरी तलावातून पाझरणाऱ्या पाण्याने प्रवाहीत होणाऱ्या नाग नदीला पुढे-पुढे लहान मोठे गटाराचे ...

The last message has to be given by the witness of the gutter! () | अंतिम निरोपही गटाराच्या साक्षीनेच द्यावा लागतो! ()

अंतिम निरोपही गटाराच्या साक्षीनेच द्यावा लागतो! ()

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अंबाझरी तलावातून पाझरणाऱ्या पाण्याने प्रवाहीत होणाऱ्या नाग नदीला पुढे-पुढे लहान मोठे गटाराचे नाले मिळतात. महाराजबागकडून येणारा नाला मिळत असल्याने सीताबर्डीतील संगमापासून नदी पात्र मोठे आहे. नाले व सिवरेज लाईनमधून नदीपात्रात येणाऱ्या गटाराचा प्रवाह वाढत जातो. वाढत्या प्रवाहासोबतच नदीचे पात्रही वाढत जाते. गटारामुळे शहरातील १७ किलोमीटर लांबीची ही नदी आता मृतप्राय झाली आहे. विशेष म्हणजे शहरातील अंबाझरी, मोक्षधाम, गंगाबाई घाट असो की पारडी घाट नदी काठावर आहेत. या पवित्र स्थळावर कुटुंब वा मित्र परिवारातील दगावलेल्या व्यक्तीला अंतिम निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. पण त्यांना नाग नदीतील गटाराचा घाण वास घेऊनच निरोप द्यावा लागतो. पुनरूज्जीवनातून अशा समस्या सुटतील का असा प्रश्न चर्चेला आला आहे. नागनदीचा पुनर्जन्म व्हावा, अशी शहरातील नागरिकांची इच्छा आहे. परंतु महापालिकेचा कारभार बघता फार हुरळून जाण्याची गरज नाही. नदी सोबतच नदीला मिळणाऱ्या नाल्यातील गटारावर प्रक्रिया करण्यासाठी ठिकठिकाणी छोटे-छोटे एसटीपी उभारावे लागतील. महापालिका व नासुप्रने अशा प्रकल्पांना गत काळात मंजुरीही दिली. परंतु या फाईलवर धूळ साचली आहे. जे काही दोन-चार सुरू झाले होते. तेही अंतिम घटका मोजत आहे. तेव्हा पुनरुज्जीवनामुळे फार काही चमत्कार होईल असे वाटण्याचे कारण नाही.

.....

हिवरीनगर ते पारडी घाट नदी लुप्तच

नागनदी पुनरूज्जीवन करताना नदीत सोडण्यात येणारे सिरेज रोखण्यासोबतच नदी पात्राच्या दोन्ही बाजूला १५ मीटर क्षेत्रात सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. परंतु नदी पात्रालगतचे अतिक्रमण काढणे तितके सोपे नाही. काही झोपडपट्ट्या ३० ते ४० वर्षापूर्वीच्या आहेत. नियमानुसार त्यांना संरक्षण मिळाले आहे. हिवरीनगर झोपडपट्टी अशीच जुनी आहे. संघर्षनगर, न्यू पँथरनगर, आदर्शनगर, नेहरूनगर, पारडी, भांडेवाडी अशा वस्त्या वसलेल्या आहेत. जागोजागी नदीत सिवरेज सोडले जात असल्याने नदी लुप्त झाली आहे. दोन्ही काठावर जागा सोडण्यात आलेली नाही. काही इमारती नदीच्या संरक्षण भिंतीवर उभारण्यात आलेल्या आहेत. वर्षानुवर्ष वास्तव्यास असलेल्या अशा रहिवाशांना येथून हटविणे इतके सोपे नाही. यासाठी आधी पुनर्वसन करावे लागणार आहे. रिंगरोडवरील पुलापासून चार जलवाहिन्या गेल्या आहेत. प्रजापतीनगर येथील पुलालगत सहा पाईपलाईन गेल्या आहेत. यात जलवाहिनी व वेस्ट वॉटर लाईनचा समावेश आहे.

....

नागभीड रेल्वे क्राॅसिंग पूल कोसळला

पारडी भागातील सेंटर पॉईंट स्कूललगत असलेला इंग्रजांच्या काळातील नाग नदीवरील नागभीड रेल्वे क्रॉसिंग पूल कोसळला आहे. पुढे पारडी दहन घाटाजवळील पुलाला समांतर मोठ्या जलवाहिन्या व वेस्ट वॉटर पाईपलाईन आहे. या पुलाची उंची कमी असल्याने नदी सौंदर्यीकरण करताना हा पूल नव्याने उभारावा लागणार आहे. या मार्गावरील जड वाहनांची असलेली मोठ्या प्रमाणातील वाहतूक विचारात घेता बांधकाम विभाागाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

....

Web Title: The last message has to be given by the witness of the gutter! ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.