१० महिन्यांत ६८ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई
By Admin | Updated: November 29, 2015 03:51 IST2015-11-29T03:51:24+5:302015-11-29T03:51:24+5:30
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध मध्य रेल्वेकडून नेहमीच तपासणी मोहीम चालविण्यात येते.

१० महिन्यांत ६८ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई
मध्य रेल्वेची कारवाई : साडेतीन कोटींहून अधिक दंड वसूल
नागपूर : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध मध्य रेल्वेकडून नेहमीच तपासणी मोहीम चालविण्यात येते. २०१५ वर्षात १० महिन्यांमध्ये रेल्वेने तब्बल ६८ हजार प्रवाशांवर कारवाई केली असून यात साडेतीन कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. प्रत्येक प्रवाशाकडून सरासरी ५१५ रुपयांचा दंड वसूल झाला आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. यात रेल्वे इस्पितळांतील भरती रुग्ण, रेल्वेगाड्यांमधून पडून किंवा स्टेशनवर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर केलेली कारवाई इत्यादी प्रश्नांचा समावेश होता. मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१५ ते ३१ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत ६८ हजार ६६९ विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. यातून ३ कोटी ५४ लाख २३ हजार ९३९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
दरम्यान, १ जानेवारी २०१० ते ३१ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत रेल्वेगाड्यांमधून पडून किंवा नागपूर रेल्वेस्थानक परिसरात १ हजार ३८३ लोकांचा मृत्यू झाला. शिवाय या कालावधीत रेल्वे इस्पितळात ४२ हजार १६३ नागरिक भरती झाले, यात मरण पावलेल्यांची संख्या ४३९ इतकी आहे.(प्रतिनिधी)