भूमाफियांचा पुन्हा खुनी खेळ
By Admin | Updated: September 7, 2016 02:42 IST2016-09-07T02:42:47+5:302016-09-07T02:42:47+5:30
जमीन मालकांमध्ये थरार नरेश डोंगरे ल्ल नागपूर कोट्यवधींच्या जमिनी हडप करण्याचा आणि

भूमाफियांचा पुन्हा खुनी खेळ
जमिनीसाठी जीव : जमीन मालकांमध्ये थरार
नरेश डोंगरे नागपूर
कोट्यवधींच्या जमिनी हडप करण्याचा आणि त्यासाठी प्रसंगी जमीन मालकाला संपविण्याचा प्रकार तसा जुनाच आहे. शहर पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारून सुपारी किलर गुन्हेगार आणि भूमाफियांचे कंबरडे मोडल्यामुळे मध्यंतरीच्या काळात खुनी खेळ थांबला होता. मात्र, जमीन मालक एकनाथराव निमगडे यांच्या हत्येची पार्श्वभूमी उघड झाल्यामुळे उपराजधानीत पुन्हा एकदा खुनी कारस्थानाचे दुष्टचक्र सुरू होते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. नागपुरातील जमिनी सोन्याच्या खाणी बनल्यामुळे उपराजधानीतील काही बिल्डर, प्रॉपर्टी डीलर आणि गुंडांनी हातात हात घालून खुनी खेळ खेळण्याचे कारस्थान रचायला १७ वर्षांपूर्वी सुरुवात केली. त्यानंतर उपराजधानीत जमीन मालक, प्रॉपर्टी डीलर तसेच त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या खुनांचे सूडचक्रच सुरू झाले. एकापाठोपाठ अनेकांच्या हत्या होऊ लागल्या. १९९९ ला बाळासाहेब अग्ने या तत्कालीन बिल्डर कम डेव्हलपर्सची सुपारी देऊन इंदोरच्या हल्लेखोरांकडून हत्या करण्यात आली होती. जमिनीच्या वादाचे अन् सुपारी किलिंगचे नागपुरातील हे पहिले प्रकरण होते. यानंतर पिंटू शिर्केचा जमिनीच्या वादातूनच राजू भद्रे आणि साथीदारांनी कोर्टात गेम केला. ही दोन्ही प्रकरणे त्यावेळी खूपच गाजली. त्यानंतर नरेंद्रनगरासारख्या पॉश एरियात कोट्यवधींची जमीन असूनही केवळ एका तुकड्यासाठी हपापलेल्या बोरकुटेने गरीब जेसीबी चालकाला गोळ्या घालून त्याचा बळी घेतला. त्यानंतर जमिनीच्या वादातूनच प्रॉपर्टी डीलर अनंता सोनी, मोंटू धिल्लर, राजू चेंडके, प्रदीप भोयर, आकाश पंचभाई, सूरज यादव, नौशाद आलम, जितू गावंडे, हेमंत दियेवार आदींचे खून पडले. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या सुपारी किलरकडून नंदनवनमध्ये गफ्फार अलीचा गेम झाला. या हत्याकांडानंतर कोट्यवधींच्या जमिनी परस्पर हडपण्यात आल्या. अनेकांनी गरीब शेतकरी, जमीन मालकांचे अपहरण करून, त्यांना आणि कुटुंबीयांना धमक्या देऊन कोट्यवधींचे मोल असलेल्या जमिनी कवडीमोल भावाने आपल्या नावावर करून घेतल्या. लॅण्डवॉर भडकणार का? नागपूर : लाखो-करोडो रुपये झटक्यात पदरात पडत असल्याने बिल्डर, डेव्हलपर्स आणि गुंडांच्या संगनमताने सुरू झालेला खुनी खेळ आणि जमीन मालकांची लूट थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पाहून तत्कालीन सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना यांनी एक अॅक्शन प्लॅन तयार केला. कोणत्याही दडपणाला भीक न घालता शहरातील उपायुक्तांना ‘हिस्ट्रीशिटर’ गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश दिले. परिणामी भूमाफियांविरुद्ध कडक कारवाई होऊ लागली. त्यामुळे खुनाचे दुष्टचक्र थांबले. पुढे (यापूर्वीचे) पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी कायद्याचा बडगा हाणून भूमाफिया तसेच गुंडांचे कंबरडेच मोडले. त्यामुळे शहरातील लॅण्डवॉर थांबले. मात्र, दोन महिन्यापूर्वी शहरातील एका बिल्डरचे झालेले अपहरण (ज्यात नंतर मांडवली झाली. त्यामुळे पोलिसांच्या रेकॉर्डवरच ते आले नाही), एका गुंडाला एका विशेष कामाची देण्यात आलेली सुपारी, दोन दिवसांपूर्वी जमिनीच्या वादातून झालेले अपहरण तसेच निमगडे यांची मंगळवारी जमिनीच्याच वादातून हत्या झाल्याने भूमाफिया जमिनीच्या तुकड्यासाठी खुनी ‘कारस्थान‘ रचण्यासाठी सक्रिय झाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी) बिल्डरांवरही झाले हल्ले जमिनीच्या वादातून केवळ जमीन मालक किंवा प्रॉपर्टी डीलरच नव्हे तर शहरातील अनेक नामवंत बिल्डरांवरही प्राणघातक हल्ले झाले. त्यापैकी बिल्डर एन. कुमार, बिल्डर डांगरे यांचे दिवाणजी आणि चार वर्षांपूर्वी जरीपटक्यातील गुप्ता नामक बिल्डरवर झालेला प्राणघातक हल्ला संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून देणारा ठरला होता. या हल्ल्यात उपरोक्त तिघेही बचावले. परंतु, अनेक बिल्डरांनी नंतर गुंडांशी हातमिळवणी केली. काहींनी गुंडांना प्रोटेक्शन मनी अर्थात् नियमित खंडणी देऊन स्वत:ला सुरक्षित करून घेतले.