चाकूच्या घावाचा खटला २० वर्षे चालला
By Admin | Updated: June 29, 2014 01:13 IST2014-06-29T00:43:35+5:302014-06-29T01:13:03+5:30
वाद किरकोळ होता, पण आरोपीने रागावर नियंत्रण ठेवले नाही. समोरच्या व्यक्तीला चाकूचे घाव घालून गंभीर जखमी केले. एका चुकीचे ओझे त्याला २० वर्षे वाहावे लागले. फिर्यादीने मोठ्या मनाने तडजोडीस

चाकूच्या घावाचा खटला २० वर्षे चालला
लोक न्यायालय : ८५२ प्रलंबित प्रकरणे निकाली
नागपूर : वाद किरकोळ होता, पण आरोपीने रागावर नियंत्रण ठेवले नाही. समोरच्या व्यक्तीला चाकूचे घाव घालून गंभीर जखमी केले. एका चुकीचे ओझे त्याला २० वर्षे वाहावे लागले. फिर्यादीने मोठ्या मनाने तडजोडीस मान्यता दिल्यामुळे हे प्रकरण आज, शनिवारी लोक न्यायालयात निकाली निघाले.
एस. के. सलीम असे आरोपीचे नाव असून तो मोमीनपुरा येथील रहिवासी आहे. मुस्ताक अली फिर्यादी आहे. त्याच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी सलीमविरुद्ध भादंविच्या कलम ३२४ अन्वये गुन्हा नोंदविला होता. ही घटना १९९४ मधील आहे. तपासानंतर पोलिसांनी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. हा खटला २० वर्षे चालला. नियमित प्रक्रियेंतर्गत प्रकरणावर निर्णय होण्यासाठी आणखी वेळ लागला असता. परंतु, लोक न्यायालयात न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या पॅनलने दोन्ही पक्षांच्या सहमतीने खटला संपविला.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे जिल्हा न्यायालयात आयोजित या लोक न्यायालयात १२३५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ८५२ प्रकरणे निकाली निघाली. प्रकरणे ऐकण्यासाठी ८ पॅनल तयार करण्यात आले होते. प्रत्येक पॅनलवर न्यायाधीश, वकील व सामाजिक कार्यकर्ता यांचा समावेश होता. दुसरे एक जुने प्रकरण १९९८ मधील होते. यात आरोपी शेखर मुर्खेने फिर्यादी मालाबाई गार्गेला डोक्यावर लोखंडी पाईप मारून जखमी केले होते. कोराडी येथील प्रकरणात गहाण ठेवलेल्या सोन्याची आरोपींनी परस्पर विल्हेवाट लावली होती. फिर्यादी अर्चना टेकाडेने ३ लाख रुपये कर्जाच्या मोबदल्यात सोने ठेवले होते. सरिता गायकवाड व मुकुंद गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत. हा वाद आपसी तडजोडीने निकाली निघाला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. के. सोनवणे व प्राधिकरणचे सचिव किशोर जयस्वाल यांच्या नेतृत्वात लोक न्यायालय यशस्वीतेत पार पडले.(प्रतिनिधी)