४४,८०० हेक्टरमध्ये खरीप पिकांचे नियाेजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST2021-05-25T04:08:46+5:302021-05-25T04:08:46+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : तालुक्यात यंदाच्या २०२१-२२ खरीप हंगामासाठी एकूण ४४,८०० हेक्टर क्षेत्रात पीक लागवडीचे नियाेजन करण्यात आले ...

४४,८०० हेक्टरमध्ये खरीप पिकांचे नियाेजन
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : तालुक्यात यंदाच्या २०२१-२२ खरीप हंगामासाठी एकूण ४४,८०० हेक्टर क्षेत्रात पीक लागवडीचे नियाेजन करण्यात आले असून, यात साेयाबीन, धान, कपाशी व तूर पिकाचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी विविध माेहीम व याेजनांच्या माध्यमातून कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
तालुक्यात २०२१-२२ खरीप हंगामाकरिता कपाशी पिकाचे क्षेत्र १७ हजार हेक्टर, साेयाबीन १५ हजार हेक्टर, तूर सलग व बांधावर मिळून २,६०० हेक्टर क्षेत्राचे नियाेजन करण्यात आले आहे. तालुका कृषी विभागामार्फत मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक, कृषी सेवक गावागावांत भेटी देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. शेतकऱ्यांनी साेयाबीन बियाणांची उगवणक्षमता तपासणी करूनच पेरणी करावी. रासायनिक व जैविक बुरशीनाशके व जिवाणू खते यांची बीजप्रक्रिया करून पुढे येणाऱ्या राेग व किडीपासून पिकाचे संरक्षण करावे. साेयाबीन पिकाची रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी किंवा पट्टा पद्धतीने लागवड करावी. जेणेकरून हेक्टरी साडेचार लाख झाडांची संख्या राहील. साेयाबीन पीक दाेन ते चार पानावर असताना पहिली फवारणी निंबाेळी अर्काची करून खाेडमाशी व चक्रीभुंगा यापासून बचाव करता येईल. तसेच कपाशी हे महत्त्वाचे पीक असून, या पिकाची पूर्वहंगामी लागवड करणे टाळावे. कपाशीची लागवड १०० टक्के रुंद सरी वरंबा पद्धतीने हाेणे अपेक्षित आहे. सापळा पिकाची लागवड (चवळी, मका, ज्वारी) तसेच हिरवळीचे खत बाेरूची आंतरपिकाप्रमाणे लागवड करून ४५ दिवसांनी जमिनीत गाडावे. जेणेकरून पिकाच्या रासायनिक खतावरील खर्चात बचत हाेऊन, तणाचे प्रभावीपणे व्यवस्थापन हाेऊ शकेल. कपाशी पिकावर पहिल्या दाेन फवारण्या या निंबाेळी अर्काच्या कराव्या व फरदड पीक घेऊ नये, असे मार्गदर्शन कृषी अधिकाऱ्यांनी केले.
...
कृषी मार्गदर्शन कक्ष स्थापन
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांची माहिती मिळावी, यासाठी गावांमध्ये कृषी मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीअंतर्गत ‘ग्राम कृषी विकास समिती’ तयार करण्याचे काम सुरू आहे. या समितीच्या माध्यमातून कृषिक्षेत्राशी संबंधित समस्यांचे निवारण हाेऊन ग्रामस्तरावर नियाेजन करण्यास मदत हाेईल. तसेच शेतकरी गटांमार्फत बांधावर खते या संकल्पनेनुसार तालुक्यात दाेन गटांनी ७.५ मेट्रिक टन खताची उचल केली असून, शेतकऱ्यांनी कृषिसेवा केंद्रात गर्दी न करता शेतकरी गटांमार्फत खते खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.