वृत्तछायाचित्रकारांमधील एकोपा कायम असू द्या
By Admin | Updated: August 20, 2016 02:26 IST2016-08-20T02:26:33+5:302016-08-20T02:26:33+5:30
आज देशाची लोकसंख्या १२० कोटी असेल तर यातील १०० कोटी लोक सेल्फीच्या माध्यमातून फोटोग्राफर बनले आहेत.

वृत्तछायाचित्रकारांमधील एकोपा कायम असू द्या
गिरीश गांधी : उदय वैतागे स्मृती पुरस्कार वितरण
नागपूर : आज देशाची लोकसंख्या १२० कोटी असेल तर यातील १०० कोटी लोक सेल्फीच्या माध्यमातून फोटोग्राफर बनले आहेत. परंतु तरीही वृत्तछायाचित्रकाराला जे दिसते ते कुणालाही दिसणे शक्य नाही. म्हणूनच वृत्तछायाचित्रकाराचे विशेष महत्त्व आहे. काळ स्पर्धेचा असला तरी वृत्तछायाचित्रकारांनी परस्परातील एकोपा कायम जपावा, असे आवाहन वनराईचे संस्थापक डॉ. गिरीश गांधी यांनी केले.
नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन आणि वनराई फाऊंडेशनतर्फे आज शुक्रवारी जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त राष्ट्रभाषा संकुलात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी मंचावर वाहतूक पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे नागपूर-अमरावती विभागाचे संचालक मोहन राठोड, नागपूरचे जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे, देवेंद्र कस्तुरे, अजय पाटील, नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेश टिकले व सत्कारमूर्तीद्वय बाळाभाऊ नागभीडकर आणि शामकांत सेलोकर उपस्थित होते.
नागपूरच्या वृत्तछायाचित्राच्या क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल बाळाभाऊ नागभीडकर आणि शामकांत सेलोकर यांना यावेळी उदय वैतागे स्मृती पुरस्कार देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्मार्तना पाटील, मोहन राठोडव देवेंद्र कस्तुरे यांनीही आपल्या भाषणातून नागपुरातील वृत्तछायाचित्रकारांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. याप्रसंगी वाहतूक पोलीस शाखेतील काही कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मुकेश कुकडे तर आभार मोनिका चतुर्वेदी हिने मानले.(प्रतिनिधी)