कालिदासाच्या शब्दसामर्थ्याचा ‘आषाढातील एक दिवस’
By Admin | Updated: June 13, 2014 01:31 IST2014-06-13T01:31:31+5:302014-06-13T01:31:31+5:30
संस्कृतचे श्रेष्ठ महाकवी कालिदास यांची प्रत्येक नाट्यकृती म्हणजे एक महाकाव्यच आहे. त्यांच्या अजरामर मेघदूतमवर आधारित मोहन राकेश लिखित हिंदीतील ‘आषाढ का एक दिन’ या नाटकाचा

कालिदासाच्या शब्दसामर्थ्याचा ‘आषाढातील एक दिवस’
अनुभूती सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ : नाट्यप्रयोगाचे सादरीकरण
नागपूर : संस्कृतचे श्रेष्ठ महाकवी कालिदास यांची प्रत्येक नाट्यकृती म्हणजे एक महाकाव्यच आहे. त्यांच्या अजरामर मेघदूतमवर आधारित मोहन राकेश लिखित हिंदीतील ‘आषाढ का एक दिन’ या नाटकाचा मराठीत ज्योती सुभाष यांनी अनुवाद केला आहे. या ‘आषाढातील एक दिवस’ या तीन अंकी नाटकाचा प्रयोग आज अनुभूती सांस्कृतिक महोत्सवात सादर करण्यात आला. हा कार्यक्रम डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाईन्स येथे पार पडला. या नाटकानेच अनुभूतीच्या सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला.
नाटकघर आणि श्री सिद्धी विनायक, पुणे निर्मित नाटकाचे दिग्दर्शन अतुल पेठे यांनी केले होते. डॉ. हर्षवर्धन मार्डिकर संकल्पित या महोत्सवाला विख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मोहन राकेश लिखित हिंदी नाटकाला १९५९ साली नाटक अकादमीचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार लाभला आहे. मराठीसह जपानी भाषेतही त्याचा अनुवाद करण्यात आला आहे. या नाटकावर आधारीत मणी कौल दिग्दर्शित सिनेमालाही फिल्मफेअरने गौरविण्यात आले आहे. कवी कालिदास आणि त्याची प्रेयसी मल्लिका यांच्या निखळ-निरागस प्रेमकथेवरील नाटक सहज भाषाशैली, ओघवते संवाद, परस्परांच्या कोमल भावनांचे हळुवार चित्रण, विरोधी पात्रांचे कुशल संयोजनासह मराठीतही एक अमिट नाट्यकृती झाली आहे. संवेदनशील मनाचा आणि उत्तुंग प्रतिभेचा कवी कालिदास निसर्गसौंदर्याने नटलेल्या लहान गावातील तरुण. मल्लिका देखणी, निरागस आणि भावनाप्रधान तरुणी. मल्लिका हीच कालिदासाची स्फूर्तीदेवता असते. आषाढातील एका पावसाळी सायंकाळी बेधुंद पावसात दोघेही भिजतात तेवढेच परस्परांच्या रोमांचक सहवासातही भिजतात. मल्लिकाची आई अंबिकाचा या प्रेमाला विरोध असतो. कारण तिच्या व्यवहारी दृष्टिकोनात निर्धन कालिदासाची किंमत नसते. त्यातच कालिदासाला उज्जयनीच्या राजदरबारात राजकवी होण्याची संधी मिळते. कालिदास मल्लिकापासून दूर जायला तयार नसतो. मल्लिका त्याला राजदरबारात जाण्याचा आग्रह धरते. त्यानंतर मात्र हा विरह कधीच संपत नाही. कालिदास ऐश्वर्यसंपन्न आणि कीर्तीमान होतो. गुप्त साम्राज्याच्या राजकुमारीसह त्याचा विवाह होतो. मल्लिका त्याच्या प्रतीक्षेत खंगते. कालिदास तिला भेटायला येतो तेव्हा मल्लिका परिस्थितीशरण गणिका आणि एका बाळाची आई होते. कालिदास निराश मनाने माघारी फिरतो, ती वेळही आषाढातील सांजवेळच. कालिदास मल्लिकाच्या भूमिकेत आलोक राजवाडे व पर्ण पेठे तर अंबिकेच्या भूमिकेत ज्योती सुभाष यांनी जीव ओतला. डॉ. दीपक मांडे, आलोक राजवाडे, ओम भूतकर, ऋचा आपटे, रणजित मोहिते, तुषार गुंजाळ, कृतार्थ शेवगावकर या कलावंतांनी अभिनयाने हे नाटक पेलून धरले. तुषार पंडित यांचे संगीत संयोजन तर दत्तात्रय शिंदे यांचे अचूक नेपथ्य यांचाही उल्लेख करावासा वाटतो. अंजली भांडारकर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी सर्व कलावंतांचा सत्कार मध्यंतरात करण्यात आला. (प्रतिनिधी)