जंगल सफारी पावसाळ्यातही सुरूच राहणार!
By Admin | Updated: June 29, 2014 01:12 IST2014-06-29T00:44:01+5:302014-06-29T01:12:29+5:30
पर्यटकांसाठी आनंद पर्वणी ठरलेले उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य इतर अभयारण्याप्रमाणे पावसाच्या दिवसात बंद ठेवण्यात यायचे. त्यामुळे या दिवसांत पर्यटकांना जंगलसफारी करता येत नव्हती. मात्र,

जंगल सफारी पावसाळ्यातही सुरूच राहणार!
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य : २४ कि.मी.चे रस्ते पर्यटकांसाठी खुले
शरद मिरे - भिवापूर
पर्यटकांसाठी आनंद पर्वणी ठरलेले उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य इतर अभयारण्याप्रमाणे पावसाच्या दिवसात बंद ठेवण्यात यायचे. त्यामुळे या दिवसांत पर्यटकांना जंगलसफारी करता येत नव्हती. मात्र, प्रथमच पावसाळ्यातही पर्यटकांसाठी हे अभयारण्य अशंत: सुरू ठेवण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. त्यामुळे पावसाळ्यात विविध वृक्षांनी हिरव्यागार नटलेल्या घनदाट उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांना जंगल सफारी करता येईल.
वाघ, बिबट यासह वन्यप्राण्यांची लक्षणीय संख्या व भुरळ पाडणारा वन्यप्राण्यांचा मुक्त संचार यामुळे अल्पावधीतचं उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य पर्यटकांच्या पसंतीस उतरले. परिणामी, वर्षभरात येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. पावसाळ्यात या अभयारण्यात जंगलसफारी करता यावी, यासाठी पर्यटकांची धडपड सुरू असते.
या दिवसांत अभयारण्यातील अंतर्गत रस्ते खराब होत असल्याने सोयीसुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाची तारांबळ उडते. शिवाय, येथील जैवविविधतेला धोका निर्माण होतो. पावसामुळे रस्ते खराब होऊन पर्यटकांची वाहने अडकण्याची शक्यता लक्षात घेता राज्यातील सर्वच अभयारण्य व व्याघ्रप्रकल्प पावसाळ्यात अंशत: बंद ठेवण्यात येतात.
राज्यात सर्वप्रथम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यात सुरू ठेवण्यात येऊ लागला. त्यांनतर गेल्या दोन वर्षापासून पेंच व्याघ्र प्रकल्प व आता उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यही पावसाळ्यात सुरू ठेवण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला असून, पर्यटकांना जंगलसफारी दरम्यान एक वेगळा आनंद अनुभवता येईल.
या अभयारण्यात पर्यटकांना जंगल सफारीसाठी कऱ्हांडला ते रानबोडी (तिप्पट) हा ६ कि.मी.चा रस्ता, रानबोडी (तिप्पट) ते नवेगाव (देशमुख) हा १० कि.मी.चा रस्ता, भालेराव (तिप्पट) ते पुल्लर प्रवेशद्वार हा ८ कि.मी.चा रस्ता, असे एकूण २४ कि.मी.चे रस्ते पर्यटकांना जंगल सफारीसाठी खुले राहणार आहे.