न्यायव्यवस्था राज्यघटनेला पुढे नेत आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 03:08 IST2016-04-27T03:08:15+5:302016-04-27T03:08:15+5:30
देशातील न्यायव्यवस्था स्वतंत्र असून ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला सतत पुढे नेण्याचे कार्य करीत आहे,

न्यायव्यवस्था राज्यघटनेला पुढे नेत आहे
न्या. भूषण गवई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण
नागपूर : देशातील न्यायव्यवस्था स्वतंत्र असून ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला सतत पुढे नेण्याचे कार्य करीत आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले.उच्च न्यायालयाच्या इमारतीमध्ये लावण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य तैलचित्राचे मंगळवारी न्या. गवई यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, प्रभारी महाधिवक्ता रोहित देव, हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष अॅड. अरुण पाटील व हायकोर्ट एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष विनोद फरकाडे उपस्थित होते. न्या. गवई यांनी भारतीय राज्यघटनेची महानता समजावून सांगितली. ही राज्यघटना समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्यायावर आधारित आहे. राज्यघटनेमुळे भारत आजही एकसंघ आहे. भारताच्या एक दिवस आधी स्वतंत्र झालेल्या शेजारी देशाने मात्र आतापर्यंत अनेकदा अस्थिरता सहन केली आहे. राज्यघटनेतील आर्टिकल ३२ चे जनक बाबासाहेब आहेत. त्यांनी विरोधाला सक्षमपणे तोंड देऊन हे आर्टिकल कायम ठेवले. हे आर्टिकल अधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध दाद मागण्याचा मार्ग आहे. यामुळे ते राज्यघटनेचा आत्मा आहे. यातून सामान्य जनतेला न्याय मिळाला आहे असे त्यांनी सांगितले.
राजकीय, आर्थिक व सामाजिक समतेशिवाय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. बाबासाहेब खरे देशभक्त होते. मी पहिला व शेवटचा भारतीयच आहे असे ते सांगत. त्यांनी देशाला एकत्र बांधून ठेवणारी घटना दिली असे विचारही न्या. गवई यांनी व्यक्त केले.
बाबासाहेब मानवतावादाचे पुढारी होते. त्यांना एका जाती-धर्मात बांधून ठेवू नका, असे आवाहन अॅड. रोहित देव यांनी केले. पाषाणातील कविता संबोधल्या जाणाऱ्या हायकोर्टाच्या इमारतीचे सौंदर्य बाबासाहेबांच्या तैलचित्रामुळे वाढलेय, असे अॅड. अरुण पाटील यांनी तर, बाबासाहेबांचे विचार अंगिकारणे हीच त्यांना आदरांजली ठरेल, असे विनोद फरकाडे यांनी सांगितले. हायकोर्ट बार असोसिएशन, डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन, सरकारी वकील कार्यालय व हायकोर्ट कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी केला.
ज्ञानाचा मुक्त प्रसार करा - न्या. धर्माधिकारी
सहज प्राप्त होणारे ज्ञान डोक्यात तर, परिश्रमपूर्वक मिळालेले ज्ञान हृदयात जात असते. बाबासाहेबांनी ज्ञानाचे बीज हृदयात जोपासून त्याचा वटवृक्ष केला व या वटवृक्षाची बीजे समाजापर्यंत पोहोचविली. याप्रमाणे सर्वांनी ज्ञानाचा मुक्त प्रसार केला पाहिजे, असे विचार न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.