झामरे दाम्पत्यावर अद्यापही दोषारोप ठेवण्यात आले नाही
By Admin | Updated: May 15, 2014 02:23 IST2014-05-15T02:23:45+5:302014-05-15T02:23:45+5:30
गुंतवणूकदारांची कोट्यवधीने फसवणूक करणार्या महाठग झामरे दाम्पत्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र

झामरे दाम्पत्यावर अद्यापही दोषारोप ठेवण्यात आले नाही
कधी मिळणार पीडित गुंतवणूकदारांना न्याय ?
नागपूर :
गुंतवणूकदारांची कोट्यवधीने फसवणूक करणार्या महाठग झामरे दाम्पत्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल होऊन एक वर्ष तीन महिन्याचा कालावधी लोटला; परंतु अद्यापही दोषारोप ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे पीडित गुंतवणूकदारांना न्याय कधी मिळेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रतापनगरच्या स्वावलंबीनगर पूनमविहार येथे राहणारे जयंत प्रभाकर झामरे आणि त्याची पत्नी वर्षा झामरे यांच्याविरुद्धचे हे प्रकरण एमपीआयडीच्या विशेष न्यायालयात प्रलंबित आहे. या दाम्पत्याविरुद्ध २२ मे २०१२ रोजी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या ४०९, ४२०, १०९, ३४ आणि महाराष्टÑ ठेवीदाराचे (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंध संरक्षण अधिनियमाच्या कलम ३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
त्यांनी २०१० मध्ये जे.एस. कॅपिटल सर्व्हिसेस आणि जे. एस. फायनान्शियल सर्व्हिसेस, या नावाने गुंतवणूक कार्यालये उघडून दर महिन्याला पाच ते सहा टक्के व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती. गुन्हा दाखल होताच दोघेही पसार झाले होते. पुढे वर्षा झामरे हिला नाशिक येथे ३१ मे २०१२ रोजी आणि जयंत झामरेला वाडी भागात ३० जुलै २०१२ रोजी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे पथकाने करून वर्षा झामरे हिच्याविरुद्ध ४ फेब्रुवारी २०१३ आणि जयंत झामरेविरुद्ध १५ फेब्रुवारी २०१३ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
२९५ गुंतवणूकदारांच्या दाखल तक्रारीनुसार या दाम्पत्याने १४ कोटी रुपयांनी फसवणूक केलेली आहे. सध्या हे दोघेही जामिनावर आहेत. त्यांची न्यायालयातील पहिली पेशी १६ मार्च २०१३ रोजी झाली होती. अद्यापही त्यांची पेशीच सुरू आहे. पुढची पेशी तारीख २० मे २०१४ ही आहे. या दाम्पत्यावर अद्यापही दोषारोप ठेवण्यात न आल्याने गुंतवणूकदारांना कधी न्याय मिळेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)