सुरांच्या क्षेत्रातील बेसुरांना वेसण घाला

By Admin | Updated: September 18, 2014 00:48 IST2014-09-18T00:48:46+5:302014-09-18T00:48:46+5:30

‘सुरांच्या क्षेत्रात बेसुरांची घुसखोरी’ या शीर्षकाखाली लोकमतने प्रसिद्ध केलेल्या बातमीने कलाक्षेत्रात खळबळ उडाली. अनेकांनी व्यक्तिसापेक्षही ही बाब घेतली. पण केवळ संगीत क्षेत्राची बदनामी न होता

Insert bussur in the security area | सुरांच्या क्षेत्रातील बेसुरांना वेसण घाला

सुरांच्या क्षेत्रातील बेसुरांना वेसण घाला

सुरांच्या मैफिलीत बेसुरांची घुसखोरी
नागपूर : ‘सुरांच्या क्षेत्रात बेसुरांची घुसखोरी’ या शीर्षकाखाली लोकमतने प्रसिद्ध केलेल्या बातमीने कलाक्षेत्रात खळबळ उडाली. अनेकांनी व्यक्तिसापेक्षही ही बाब घेतली. पण केवळ संगीत क्षेत्राची बदनामी न होता चांगल्या कलावंतांना वाव मिळाला आणि नव्या हौशी कलावंतांना प्रोत्साहन मिळून त्यांच्यातील कलावंत घडावा, ही लोकमतची भूमिका होती आणि आहे. यासंदर्भात शहरातील संगीत क्षेत्रात चर्चा झाली. अनेकांनी लोकमतला फोन करून धन्यवाद दिले, अनेक कलावंतांनी लोकमतच्या भूमिकेचे स्वागत केले. या क्षेत्रात अनेक कलावंत रियाज करून आले आहेत. पण खऱ्या कलावंतांना प्रायोजक मिळत नाहीत आणि ते मागे पडतात तर केवळ पैसा असणारे काही लोक जाहीर कार्यक्रमातून समोर येतात. यामुळे प्रेक्षकांना मनस्ताप सहन करावा लागतो. स्वत:ला घासून तयार करणाऱ्या आणि संगीताचे ज्ञान असलेल्या कलावंतांना योग्य संधी मिळावी आणि रसिकांना आनंद मिळावा म्हणून सुरांच्या क्षेत्रातील बेसुरांची घुसखोरी थांबविण्यासाठी काय करता येऊ शकते, याबाबत अनेकांनी आपली मते आग्रहाने व्यक्त केली. अशा बेसुरांना वेसण घालण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. शहरातील संगीत क्षेत्रातील मान्यवरांशी साधलेल्या या संवादातून बऱ्याच बाबी समोर आल्या. (लोकमत चमू)
मार्गदर्शनाशिवाय गायनासाठी उतरूच नये
संगीत क्षेत्रात सादरीकरण करताना गुरूची गरज असते. शास्त्रीय संगीत असो वा सुगम गायन त्यासाठी मार्गदर्शन घेतले पाहिजे. गुरूचा सल्ला न घेता, त्यांचे मार्गदर्शन न घेता रंगमंचावर थेट सादरीकरणासाठी उतरणे चुकीचे आहे. गायनाचे कौशल्य नसणारे असे लोक गायन सादर करतात आणि काही त्यांचे नातेवाईक, जवळचे लोक त्यांना दादही देतात. त्यामुळे त्यांना मोठे गायक झाल्यासारखे वाटते आणि खऱ्या रसिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. दाद मिळत असल्याने अशा बेसुरांचे धैर्य वाढते. तयार असणाऱ्या अनेक कलावंतांना प्रायोजक मिळत नाहीत, त्यामुळे त्यांची कला मागे पडते. सध्या इव्हेन्टवाल्यांचा जमाना आहे. इव्हेन्ट करणाऱ्यांना संधी मिळते आणि ते कितीही बोगस गायन करीत असले तरी त्यांची प्रसिद्धी होते. यासाठी किमान शास्त्रीय संगीताचे ज्ञान असले पाहिजे. काही लोकांना दैवी देणगी असते. यात किशोरकुमार यांचे नाव घेता येईल. पण त्यांना ही जन्मत:च देणगी होती. अशी देणगी असली तरी मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय गायन सादर करणे म्हणजे स्वत:चे नुकसान करणे आहे. जे लोक योग्य आणि चांगले गायन करीत नाही त्यांच्याकडे प्रेक्षकांनीच पाठ फिरविली पाहिजे. लोकांनी प्रतिसाद दिला नाही तर अशा बेसूर गाणाऱ्यांना चाप बसेल. रसिकांनीही दुटप्पीपणा सोडून चांगले गाणाऱ्यांनाच दाद द्यावी.
सूरमणी पं. प्रभाकर धाकडे
ज्येष्ठ व्हायोलिन वादक, संगीतकार
रियाज करूनच गीत सादरीकरण व्हायला हवे
हल्ली सारेच इन्स्टंट झाले आहेत. त्यात अनेक नव्या लोकांनाही लगेच गीत सादर करण्याचा मोह होतो. हे मी स्वत:ही अनेकदा अनुभवतो. पण शास्त्रीय संगीत कठीण आहे तसेच एखादे गीत सादर करणेही सोपे नाही. सुगम गीत गाण्यासाठी शास्त्रीय संगीताचा खूप अभ्यास करावाच लागतो, असे सरसकट म्हणणार नाही. पण किमान गाण्याची जाण, समज असावी लागते. दूरचित्रवाणीच्या अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये चांगले गीत सादर करणारी मुले शास्त्रीय संगीताचे जाणकार नसतात, पण त्यांच्या गळ्यावर गाण्याचा संस्कार असतो. त्यांचाही रियाज असतो. गाण्यासाठी हा रियाज महत्त्वाचा आहे. मी स्वत: शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे आणि आजही स्वत:ला परिपूर्ण समजत नाही. हे क्षेत्र सातत्याने शिकत राहण्याचे आहे. पण नवीन मुले थेट गायनाची संधी मागतात, तेव्हा वाईट वाटते. यात हौशी कलावंतांनी सादरीकरण करूच नये, असे म्हणणे मात्र चुकीचे ठरेल. हौशी कलावंतांनी सादरीकरण केल्याशिवाय त्यांना प्रोत्साहन मिळणार नाही. अनेकांना हौस असते आणि गाणे सादर करण्याची इच्छा असते. त्यांनी गाणे का सादर करू नये? पण अशा लोकांनी किमान तयारी करून सादरीकरण केले पाहिजे, हे मान्य आहे. याशिवाय हौशी गायकांचे कार्यक्रम नि:शुल्क असतात. त्यांच्या हौसेसाठी कार्यक्रम असतात. रसिकांना त्यांचे गाणे आवडत नसेल तर त्यांनी कार्यक्रमाला जाऊ नये. पण हौशी गायकांनाही त्यांचा कार्यक्रम करण्याचा अधिकार आहे. याशिवाय माध्यमांनीही गाणे सादर करणाऱ्या कलावंतांचे समीक्षण केले तर लोकांना चांगले गायक आपोआप कळतील.
गायक अनिरुद्ध जोशी,
संचालक, आविष्कार कला अकादमी
परिश्रमाशिवाय गाणे सादर करता येत नाही
कुठल्याही कलाप्रकारासाठी परिश्रमाची नितांत गरज असते. मी स्वत: २७ वर्षांच्या रियाजानंतर आज समोर आलो आहे. त्यामुळे नव्या कलावंतांनी इन्स्टंट प्रसिद्धीच्या मागे लागण्यात अर्थ नाही. पण हौशी गायकांनाही गीत सादर करण्याची इच्छा असते. अशावेळी नि:शुल्क कार्यक्रमात त्यांना गाण्याची संधी प्रोत्साहनासाठी दिली जाते. हा तिकीट शो नसतो. त्यापूर्वी नवोदित गायकांकडून तयारी करून घेतली जाते आणि गीत सादर करण्याइतपत तयारी झाल्यावरच आम्ही त्यांना संधी देतो. हे रियाज आणि साधनेचे क्षेत्र आहे. पण याचे अनेक टप्पे आहेत. एकेक टप्पा पार करीत गायकाने समोर जायचे असते. गायनाचे क्षेत्र वाढावे आणि नवनवीन गायक तयार व्हावेत म्हणून माझा प्रयत्न आहे. नव्या गायकांना संधी देणे आणि त्यांना तयार करण्याच्या प्रक्रियेत त्यांना रंगमंचावर संधी देण्यात अयोग्य काहीच नाही. कारण त्याशिवाय त्यांच्यात धाडस निर्माण होत नाही. पण नवोदितांचे असे कार्यक्रम कुणी जाहीरपणे आणि सशुल्क करायला नकोत. अनिरुद्ध जोशी आणि मी आम्ही दोघांनीही शास्त्रीय संगीताचे ज्ञान घेतले आहे. त्यामुळेच सारेगमप स्पर्धेत आम्ही नागपूरचे नाव उंचावले आहे. माझ्या विद्यार्थ्यांनाही मी परिश्रम आणि तयारीशिवाय संधी देत नाही. त्यामुळे गाण्याची जाण नसणाऱ्यांनी रसिकांची परीक्षा घेण्याचे टाळावे आणि रियाजाकडे लक्ष द्यावे.
गायक निरंजन बोबडे, संचालक, स्वरतरंग संगीत अकादमी

Web Title: Insert bussur in the security area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.