कुख्यात सफेलकरची आज कोर्टात पेशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:09 IST2021-04-07T04:09:39+5:302021-04-07T04:09:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आर्किटेक्ट एकनाथ निमगडेची पाच कोटी रुपयांत सुपारी घेऊन त्याची हत्या घडवून आणणारा तसेच कुख्यात ...

कुख्यात सफेलकरची आज कोर्टात पेशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर्किटेक्ट एकनाथ निमगडेची पाच कोटी रुपयांत सुपारी घेऊन त्याची हत्या घडवून आणणारा तसेच कुख्यात गुंड मनीष श्रीवासचे अपहरण करून त्याची सिनेस्टाइल हत्या करणारा गँगस्टर रणजित सफेलकर याला बुधवारी गुन्हे शाखेचे पोलीस न्यायालयात हजर करणार आहेत. त्याच्या पीसीआरचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे त्याचा पीसीआर पुन्हा वाढवून मिळावा, अशी मागणी पोलीस करणार आहेत.
मार्च २०१२ मध्ये आपल्या गुंडांच्या मदतीने कुख्यात सफेलकरने कालू तसेच भरत हाटे, छोटू बागडे, ईशाक मस्ते आणि इतर साथीदारांच्या मदतीने कुख्यात मनीषचे अपहरण करून त्याची कामठी जवळच्या एका फार्म हाऊसवर भीषण हत्या केली होती. यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावली होती. हे भीषण हत्याकांड गुन्हेगारी जगतात बहुतांश जणांना माहिती असूनही कुणीच वाच्यता न केल्याने तो चांगलाच निर्ढावला होता. या हत्याकांडानंतर त्याने अनेक गंभीर गुन्हे केले. त्यानंतर कोट्यवधींच्या जमिनीमुळे अनेकांसाठी अडचण ठरलेल्या एकनाथ निमगडे यांची हत्या करण्यासाठी सफेलकरने पाच कोटींची सुपारी घेतली. सफेलकरचा राइट हॅण्ड कालू हाटेने ही सुपारी नब्बूला पलटवली आणि यूपी, एमपीतील शूटर बोलवून निमगडेंची हत्या घडवून आणली. २०१६ मध्ये झालेल्या या हत्याकांडाचीही फाइल जवळपास बंद होण्याच्या तयारीत असताना अखेर पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने मनीष श्रीवाससोबतच निमगडे हत्याकांडाचाही छडा लावला. निमगडे हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे असल्याने पोलिसांनी मनीषच्या अपहरण आणि हत्याकांडात आरोपी सफेलकर, कालू आणि भरत हाटेंना वेगवेगळ्या ठिकाणी अटक केली. कालू आणि भरतचा १२ दिवसांचा पीसीआर झाल्याने त्यांची न्यायालयाने आज कारागृहात रवानगी केली. तर सफेलकरच्या पीसीआरचा आज शेवटचा दिवस असल्याने त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
----
डझनभर तक्रारदार तयार
सफेलकर टोळीचा पोलिसांनी बंदोबस्त केल्यामुळे त्याच्या दहशतीत असलेल्या पीडितांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता दररोज गुन्हे शाखेत तक्रारदार आपली कैफियत मांडण्यासाठी धाव घेत आहेत. गेल्या आठवडाभरात डझनभर तक्रारदार पोलिसांकडे आले असून त्यांच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गुन्हे दाखल केले जातील, असे या संबंधाने पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे.
----