इंडोनेशियाच्या कौन्सिल जनरलनी केले ऊर्जामंत्र्यांचे कौतुक
By Admin | Updated: March 21, 2017 01:46 IST2017-03-21T01:46:58+5:302017-03-21T01:46:58+5:30
राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या अडीच वर्षांत ऊर्जा विभागात धाडसी निर्णय घेत या खात्यात नवी ऊर्जा भरली.

इंडोनेशियाच्या कौन्सिल जनरलनी केले ऊर्जामंत्र्यांचे कौतुक
रेडियंट महाराष्ट्र कॉफीटेबल बुकची घेतली दखल : राज्याच्या ऊर्जा मंत्रालयाची गतिमान वाटचाल
नागपूर : राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या अडीच वर्षांत ऊर्जा विभागात धाडसी निर्णय घेत या खात्यात नवी ऊर्जा भरली. या गतिमान वाटचालीची माहिती देणाऱ्या ‘रेडियंट महाराष्ट्र’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. इंडोनेशियाच्या कौन्सिल जनरलने या पुस्तकातील निर्णयांची दखल घेत ऊर्जामंत्री बावनकुळे यांचे कौतुक केले आहे.
या पुस्तकाद्वारे राज्यातील ऊर्जाक्रांतीची दखल देश-विदेशात घेतली जाऊ लागली आहे. मुंबईतील इंडोनेशियाचे कौन्सिल जनरल सॉत सिरिंगोरिंगो यांनी यासंदर्भात पाठविलेल्या पत्रात ऊर्जा मंत्रालयाच्या उपक्रमामुळे महाराष्ट्र हे देशातील इकॉनॉमिक पॉवर हाऊस म्हणून लवकरच पुढे येईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर ऊर्जा विभागाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आली. त्यानंतर त्यांनी दररोज १८ ते २० तास काम करण्याचा धडाका लावला. ऊर्जाबचतीपासून ते ऊर्जानिर्मितीतील खर्चात बचत करण्यापर्यंत अनेक उपाय योजले. तसेच भविष्यातील ऊर्जेची गरज आणि त्याचे नियोजन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले.
ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी कृषी फिडर वेगळे करण्याचा निर्णय कौन्सिल जनरल यांनी अधोरेखित केला. हा निर्णय ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी गेम चेंजर ठरेल, असेही कौन्सिल जनरल यांनी म्हटले आहे.
सध्या पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीवर जगात सगळीकडे भर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात पर्यावरणपूरक ऊर्जेसाठी पवनऊर्जा, सौरऊर्जा, कृषी टाकाऊ पदार्थ, उसाची चिपाडे या स्रोतांपासून १४ हजार ४०० मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे या पत्रातून नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य हे वीज तुटवड्याऐवजी मागणीपेक्षा जास्त वीजनिर्मिती करण्याकडे वाटचाल करीत असल्याची बाब आनंददायी असल्याचेही पत्रात म्हटले आहे. रेडियंट महाराष्ट्र या पुस्तकाचे संपादन मराविमं सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केले आहे. (प्रतिनिधी)