जलयुक्त शिवारमुळे पाणीसाठ्यात वाढ
By Admin | Updated: August 21, 2016 03:27 IST2016-08-21T03:27:45+5:302016-08-21T03:27:45+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाकांक्षी अभियान असलेल्या जलयुक्त शिवारमध्ये महाराष्ट्रातील दुष्काळी

जलयुक्त शिवारमुळे पाणीसाठ्यात वाढ
१,३२,८५४.३८ टीसीएम साठ्याची क्षमता : ७७२४७.२२ हेक्टर सिंचन क्षेत्र संरक्षित
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाकांक्षी अभियान असलेल्या जलयुक्त शिवारमध्ये महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती कायमची बदलण्याची क्षमता आहे. जलयुक्त शिवारची निम्मी कामे अजूनही शिल्लक असली तरी झालेल्या कामांचे परिणामही चांगले दिसून येत आहेत. जलयुक्त शिवारअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध कामांमुळे आतापर्यंत नागपूर विभागात एकूण १,३१,८५४३८ टीसीएम पाणीसाठा करता येईल, इतकी क्षमता निर्माण झाली असून प्रत्यक्षात १,१४,६५९.७८ टीसीएम इतका साठा निर्माण झोलला आहे.
राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी गेल्या गुरुवारी नागपूर विभागातील जलयुक्त शिवारच्या कामाचा आढावा घेतला. त्यात प्रत्येक जिल्ह्याने सादर केलेल्या आढाव्यावरून ही बाब स्पष्ट झाली आहे. नागपूर विभागात सर्वाधिक पाणीसाठा नागपूर जिल्ह्यात होणार आहे. तर चंद्रपूरने सर्वाधिक पाणीसाठी प्रत्यक्षात निर्माण केला आहे. यासोबतच सिंचनालाही याचा लाभ होणार आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामुळे नागपूर विभागात एकूण ७७,२४७.२२ हेक्टर सिंचनक्षेत्र संरक्षित झाले आहे. यात भूजल, पुनर्भरण व बाष्पीभवनाने कमी होणारे पाणी सोडून संरक्षित सिंचनासाठी एकूण ६५,६८८.६६ टीसीएम इतके पाणीसंरक्षित सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)