तलाठी साझाच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2016 03:04 IST2016-04-28T03:04:52+5:302016-04-28T03:04:52+5:30
तलाठी साझांची पुनर्रचना व राज्यातील महसूल मंडळांच्या पुनर्रचनेबाबत विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्य

तलाठी साझाच्या संख्येत वाढ
तब्बल ४० वर्षानंतर वाढ : मंत्रिमंडळाची तत्त्वत: मंजुरी
नागपूर : तलाठी साझांची पुनर्रचना व राज्यातील महसूल मंडळांच्या पुनर्रचनेबाबत विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्य अध्यक्षतेखाली महसूल विभागाने एक अभ्यासगट समिती गठित केली होती. या समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे.
या समितीच्या अहवालातील वाढीव तलाठी साझा व मंडळ अधिकारी कार्यालये निर्मितीविषयीच्या शिफारशींना मंत्रिमंडळाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. यानुसार राज्यातील तलाठी साझाचे एकूण संख्या ३,०८४ ने वाढणार आहे. तब्बल ४० वर्षानंतर ही वाढ करण्यात आली असून यामुळे तलाठ्यांची संख्याही वाढणार आहे.
या समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी बुधवारी यासंदर्भात पत्रकारांना माहिती दिली. त्यांनी सांगितले, तलाठ्यांना महसुली कामासोबतच महसूल वसुली, करमणूक कर, गौण खनिज वसुली, पीक पैसेवारी, फेरफार नोंंदणी, गाव नमुने अद्ययावतीकरण, सीमा आणि भूमापन चिन्हेसंबंधी कामे, निवडणूक संबंधीची कामे, पुरवठा कामे, निवडणूक, जनगणना आदी अनेक कामे करावी लागतात. लोकसंख्या वाढ व कामकाजात वाढ या तुलनेने तलाठ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे त्यांच्या संख्येत वाढ होण्याच्या दृष्टीने तलाठी साझा संख्येत वाढ होणे आवश्यक होते.
या अनुषंगाने अभ्यास समिती स्थापन केली होती. समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे. त्यात महानगरपालिका क्षेत्रात पूर्वी २३९ इतकी साझ्यांची संख्या होती ती आता ३६६ वर जाईल म्हणजे १२७ ने वाढ होईल.
महानगरपालिका क्षेत्राच्या १० कि.मी पर्यंतचे क्षेत्र (झालर) पूर्वी २१९ आता ३०७ , ८८ वाढणार, अ व ब नगरपालिका पूर्वी १४४ आता २०१, ५७ वाढणार, अ व ब नगरपालिका क्षेत्राच्या ५ किमी पर्यंतचे क्षेत्र पूर्वी २७४ आता ३२८, ५४ वाढणार, क वर्ग नगरपालिका, गिरीस्थान नगरपालिका व नगरपंचायती पूर्वी २०९ होत्या, आता २७२ , ६३ वाढणार, ग्रामीण भाग पूर्वी ९८५३ होते, आता १२२०७ , २३५४ वाढणार, आदिवासी भाग, माडा, मिनी माडा, टीएसपी पूर्वी ११४८ होते, आता १४८३ होणार, ३३५ वाढणार आणि तटीय क्षेत्र पूर्वी २४१ होते ते आता २४७ म्हणजे ६ वाढणार, एकूण राज्यात पूर्वी १२३२७ इतके तलाठी साझा होते.
ते आता १५,४११ इतके होणार आहेत. मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी मिळाल्यावर तलाठ्यांची पदभरती ही टप्प्याटप्प्याने केली जाईल, असेही अनुप कुमार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)