विज्ञान व तंत्रज्ञानाचे ‘बजेट’ वाढविणार
By Admin | Updated: June 29, 2014 00:52 IST2014-06-29T00:52:10+5:302014-06-29T00:52:10+5:30
विज्ञानाला कोणतीही भाषा नसते, सीमा नसते. त्यामुळे कुणाला कुठेही संशोधन करता यावे, यासाठी विज्ञान व वैज्ञानिकांमधील दरी दूर केली जाईल. शिवाय विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बजेटमध्ये विशेष

विज्ञान व तंत्रज्ञानाचे ‘बजेट’ वाढविणार
विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अधिवेशन : जितेंद्र सिंग यांची घोषणा
नागपूर : विज्ञानाला कोणतीही भाषा नसते, सीमा नसते. त्यामुळे कुणाला कुठेही संशोधन करता यावे, यासाठी विज्ञान व वैज्ञानिकांमधील दरी दूर केली जाईल. शिवाय विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बजेटमध्ये विशेष वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी केली.
विज्ञान भारतीच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाचे शनिवारी आयटी पार्कमधील पर्सिस्टन्ट कंपनीच्या सभागृहात जितेंद्र सिंग यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विज्ञान भारतीचे अध्यक्ष व ज्येष्ठ संशोधक डॉ. विजय भटकर, विज्ञान भारतीचे मार्गदर्शक सुरेश सोनी, महापौर व आमदार प्रा. अनिल सोले, माधवन नायर, जय कुमार, के. वाय. वासू व जयंत सहस्रबुद्धे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या दोन दिवसीय अधिवेशनाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.
जितेंद्र सिंग पुढे म्हणाले, सध्या देशात प्रमुख ३८ प्रयोगशाळांसह विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. मात्र यापैकी अनेक संस्थांमधील प्रमुख पदे रिक्त आहेत. त्यावर ताबडतोब नियुक्त्या करण्याची गरज आहे. शिवाय ‘व्हिजन-२०२०’विषयी बोलताना, भारताला विज्ञान व तंत्रज्ञानाशिवाय ‘सुपर पॉवर’चे स्वप्न पूर्ण करणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. परंतु या वैज्ञानिक प्रगतीसोबतच संस्कृती व मूल्यांचीही जोपासना झाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी समाज व संस्कृतीमध्ये समन्वय साधण्याची गरज आहे. गत काही वर्षांत भारताने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती केली. मात्र त्यासोबतच मनुष्य हा भावनिकरीत्या एक दुसऱ्यापासून दुरावत चालला असून ही चिंतेची बाब आहे. आज कोणताही पालक आपल्या मुलाला संशोधक बनवू इच्छित नाही. तो केवळ आयआयटीमध्ये पाठविण्याचे स्वप्न पाहू लागला आहे.
समाजाची ही मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ सदस्यांचा गौरव
यावेळी या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाचे औचित्य साधून पाहुण्यांच्या हस्ते विज्ञान भारतीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. शिवाय संस्थेतील ज्येष्ठ सदस्यांचा शाल-श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)
विज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोहोचावे
यावेळी सुरेश सोनी यांनी मार्गदर्शन करताना, गत काही वर्षांत समाजाच्या विकास प्रवासात अनेक चमत्कारिक परिवर्तन झाले असून, त्यात विज्ञानाची फार मोठी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या काळात भौतिकदृष्टीने सृष्टी लहान होत आहे, पण भावनात्मकदृष्ट्या ती दुरावत चालली आहे. मनुष्यामध्ये सृष्टीतील प्रत्येक गोष्टीवर कब्जा करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. शिवाय विज्ञानाचा सामान्य जनतेला उपयोग काय? असा दुसरा प्रश्न निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले. डॉ. भटकर यांनी प्रास्ताविकातून विज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करीत, त्यासाठी विज्ञान भारतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची सविस्तर माहिती दिली.