मन आणि विचार सुधारल्याने चारित्र्य निर्मिती

By Admin | Updated: July 6, 2016 03:12 IST2016-07-06T03:12:59+5:302016-07-06T03:12:59+5:30

पाणी वर नेण्यासाठी यंत्राचा उपयोग केला जातो, तसेच मनाला वर घेऊन जाण्यासाठी मंत्राची आवश्यकता आहे.

Improve character and mind by enhancing character | मन आणि विचार सुधारल्याने चारित्र्य निर्मिती

मन आणि विचार सुधारल्याने चारित्र्य निर्मिती

मुनीश्री प्रतीकसागर महाराजांचे जुनी शुक्रवारी येथे प्रवचन
नागपूर : पाणी वर नेण्यासाठी यंत्राचा उपयोग केला जातो, तसेच मनाला वर घेऊन जाण्यासाठी मंत्राची आवश्यकता आहे. मन सुधारेल तर विचार सुधारतील. विचार सुधारतील तर व्यक्ती सुधारेल आणि व्यक्ती सुधारल्यास चारित्र्य सुधारेल. मनात चारित्र्य निर्मितीचे विचार असणे आवश्यक आहेत. गुन्हा हाताने होतो, मात्र पाप मनातून घडते. न्यायालय हाताला शिक्षा देते, मात्र मनाला शिक्षा कर्मातूनच दिली जाऊ शकते, असे विचार मुनीश्री प्रतीकसागरजी महाराज यांनी मंगळवारी प्रवचनादरम्यान श्रावकांसमोर मांडले.
मंगळवारला मुनीश्री प्रतीकसागरजी महाराजांचे श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन खंडेलवाल मंदिर, जुनी शुक्रवारी येथे आगमन झाले. मोठ्या संख्येने उपस्थित श्रावकांनी मुनीश्रींचे पादप्रक्षालन करुन स्वागत केले. मंदिराच्या प्रांगणात धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. धर्मसभेच्या सुरुवातील आचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांच्या चित्राचे अनावरण करण्यात आले. दीप प्रज्वलन अनिल जैन, दीपक जैन, रतनलाल गंगवाल, संतोष पेंढारी, रवींद्र आग्रेकर, रमेश जेजानी, महेश जेजानी, सुमत लल्ला यांनी केले.
ट्रस्टचे ट्रस्टी निरंजन बोहरा, सुबोध कासलीवाल, पंकज बोहरा, सुदेश बज, सुनील पाटणी आदींनी मुनीश्रींचे पादप्रक्षालन केले. बुधवारी सकाळी ८.३० ते ९.३० वाजतापर्यंत प्रवचनाचे आयोजन करण्यात येईल.(प्रतिनिधी)

Web Title: Improve character and mind by enhancing character