हेल्मेट नसल्यास ५०० रुपयांचा दंड

By Admin | Updated: August 15, 2016 01:40 IST2016-08-15T01:40:50+5:302016-08-15T01:40:50+5:30

स्वातंत्र्य दिनानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलेच महागात पडणार आहे.

If not helmet, Rs. 500 penalty | हेल्मेट नसल्यास ५०० रुपयांचा दंड

हेल्मेट नसल्यास ५०० रुपयांचा दंड

वाहतूक पोलीस विभागाने कसली कंबर : फॅन्सी प्लेटला १००० तर विमा नसल्यास २००० रुपये दंड
नागपूर : स्वातंत्र्य दिनानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलेच महागात पडणार आहे. कारण, तडजोड शुल्काची (दंड) रक्कम दुप्पट नव्हे तर २० पट वाढविण्यात आली आहे. उपराजधानीत १६ आॅगस्टपासून विना हेल्मेट दुचाकी चालविल्यास ५०० रुपये, फॅन्सी नंबर प्लेटचा वापर केल्यास १००० रुपये तर वाहनांची शर्यत लावल्यास २००० रुपये दंड आकारला जाणार आहे.
परिवहन मंत्र्यांनी नुकतीच हेल्मेटशिवाय पेट्रोल देणाऱ्या पंपचालकांवर कारवाई करण्याची घोषणा केली होती. याच्याविरोधात पंपचालकांनी दंड थोपटल्याने या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागास दिले. यामुळे हा निर्णय ५ आॅगस्टपर्यंत स्थगित करण्यात आला. परंतु याची मुदत संपत नाही तोच परिवहन विभागाने, वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीस गुन्ह्याची कमी दंडाची तरतूद असल्याचे कारण पुढे करीत तडजोड शुल्कात मोठ्याप्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेतला, तशी सभागृहातही घोषणा करण्यात आली. त्यानुसार मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम २०० मधील तरतुदीनुसार दंडाची रक्कम वाढविण्याबाबतची अधिसूचना ४ आॅगस्ट रोजी निघाली. मात्र नागपुरात ती लागू करण्यास उशीर होत होता. अखेर पोलीस आयुक्तांनी या संदर्भात नुकतेच निर्देश दिले. त्यानुसार स्वातंत्र्य दिनानंतर ते लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे १६ आॅगस्टपासून वाहन चालविण्याच्या बेशिस्तीला लगाम लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)

यांना असणार ५०० रुपये दंड
आता दुचाकी चालकाने व मागे बसणाऱ्याने हेल्मेट न घालणे, विना वाहन परवाना (लायसन्स) वाहन चालविणे, शारीरिक वा मानसिकदृष्ट्या अपात्र असताना वाहन चालविणे, अधिकाऱ्यांच्या सूचनांचे उल्लघंन करणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
तर एक हजार रुपये दंड
अतिवेगाने वाहन चालविणे, वाहनावर ‘फॅन्सी’ नंबर प्लेट बसविणे, दादा, मामा, भाई, बाबा अशा अक्षरांमध्ये नंबर प्लेट रंगविणे, वाहनांवर ‘रिफ्लेक्टर्स’ किंवा ‘टेल लाईट नसणे’, वाहनात अवैध बदल करणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
यांना बसणार दोन हजार रुपये भुर्दंड
वाहनांची शर्यत लावणे, विना नोंदणी चारचाकी वाहन चालविणे व विमा (इन्शुरन्स) नसताना वाहन चालविणाऱ्यास दोन हजार रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.

स्वातंत्र्यदिनानंतर नव्या दंडाची रक्कम वसूल करणार
पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार स्वातंत्र्यदिनानंतर जो वाहतूक नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्याकडून नव्या तडजोड शुल्काची (दंड) रक्कम वसूल केली जाणार आहे. या संदर्भातील निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन आहे.
- स्नार्तना पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक शहर

 

Web Title: If not helmet, Rs. 500 penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.