-तर दूध, भाजीपाला पाठविणार नाही
By Admin | Updated: June 2, 2017 02:21 IST2017-06-02T02:18:32+5:302017-06-02T02:21:01+5:30
विविध शेतकरी संघटनांच्या संयुक्त कृती समिती असलेल्या किसान क्रांती अंतर्गत आजपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला.

-तर दूध, भाजीपाला पाठविणार नाही
वाकोडीत शेतकऱ्यांचे धरणे : सरकारला इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध शेतकरी संघटनांच्या संयुक्त कृती समिती असलेल्या किसान क्रांती अंतर्गत आजपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला. सातारा-सांगलीतील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध व भाजीपाला फेकून पहिल्याच दिवशी आपली ताकद दाखविली. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. नागपूर व विदर्भात या आंदोलनाचे लोण उशिरा पोहोचल्याने संपूर्ण नागपूर जिल्ह्यात आंदोलनाची तीव्रता दिसून आली नाही. मात्र शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात वाकोडी या गावात धरणे आंदोलन करून शेतकऱ्यांनी आपणही आंदोलनात मागे नसल्याचे दाखवून दिले.
पाटणसावंगी येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकोडी या गावात शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात ग्राम पंचायतीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष राम नेवले यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात अरुण केदार, राजू नागुलवार, अरविंद देशमुख, प्रभाकर काळे, ज्ञानेश वाकुडकर उपस्थित होते. वाकोडी या गावातील आशिष राऊत हे दुधाचा व्यवसाय करतात. आंदोलनादरम्यान त्यांनी दुधाची कॅन आंदोलन स्थळी जमिनीवर टाकून यापुढे आपण शहराला दूध पुरवठा करणार नाही, असा संकल्प केला. तसेच विनायक खोरगडे या शेतकऱ्याने भाजीपाला फेकून शहराला भाजीपाला न पाठविण्याचा निर्णय घेतला.