विचारवंतांची हत्या ही वैचारिक कट्टरताच
By Admin | Updated: September 21, 2015 03:16 IST2015-09-21T03:16:29+5:302015-09-21T03:16:29+5:30
दाभोलकर, पानसरे आणि त्यानंतर कलबुर्गी या पुरोगामी विचारांच्या लोकांची हत्या करण्यात आल्याने समाजमन ढवळून निघाले आहे.

विचारवंतांची हत्या ही वैचारिक कट्टरताच
हत्येचे राजकारण - राजकारणाची हत्या विषयावर परिसंवाद : मान्यवरांचे मत
नागपूर : दाभोलकर, पानसरे आणि त्यानंतर कलबुर्गी या पुरोगामी विचारांच्या लोकांची हत्या करण्यात आल्याने समाजमन ढवळून निघाले आहे. विचारांचा विरोध हा तात्त्विक मुद्यांवर आणि वैचारिक पातळीवरच व्हायला हवा.
पण वैचारिक विरोध करण्याऐवजी विचारवंत, लेखकांची हत्या करणे हा कट्टरतावादच आहे. धार्मिक श्रद्धांचे अवडंबर सध्या माजले आहे आणि धर्मांमध्ये अहमहमिका निर्माण झाल्याने आपले तेच चांगले हे सांगण्याचा अट्टाहास वाढतो आहे. या हत्यांच्या मागे हेच राजकारण असून ही बाब सर्वच धर्मांना आणि समाजाला मारक आहे.
इतरांच्या विचारांचा आदर करून आपले म्हणणे समजून सांगणारा विवेकवादी आणि विज्ञाननिष्ठ निकोप समाज निर्माण करण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत, यासंदर्भात चर्चासत्रात साधकबाधक चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने
‘हत्येचे राजकारण
राजकारणाची हत्या’ विषयावर चर्चेचे आयोजन शंकरनगर येथील राष्ट्रभाषा भवनाच्या चिंतनकक्षात करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या माजी तत्त्वज्ञान विभागप्रमुख सुनीती देव तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रमोद मुनघाटे, रमेश बोरकुटे उपस्थित होते. याप्रसंगी रमेश विचारे, डॉ. अनिल नितनवरे, डॉ. भूषण रामटेके, अजय शाहू, अशोक नाफडे, जयंत कुळकर्णी, मोकाशी, धनंजय मांडवकर आदींनी प्रमुख अतिथींसह विचार व्यक्त केले. कट्टरतावादामागे धर्म आणि धार्मिक श्रद्धांचाच मोठा भाग असल्याचा विचार यावेळी प्रामुख्याने समोर आला. देव म्हणाल्या, धर्म आणि देव मानवनिर्मित आहे. धर्माचा संबंध श्रद्धेशी येतो आणि श्रद्धा अंधच असते. त्यामुळे घोळ होतो. यासाठीच धर्मचिकित्सा विवेकवादी, विज्ञाननिष्ठ समाजाची गरज आहे. हिंसा हे कुठल्याच प्रश्नाचे उत्तर होऊ शकत नाही. बोरुकुटे म्हणाले, धर्माची दहशत ग्रामीण समाजात आहे, यातूनच एकारलेपणा वाढतो आहे. डॉ. मुनघाटे म्हणाले, सामाजिक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्राथमिक शिक्षणापासून अभ्यासक्रमातून प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. त्याशिवाय विज्ञाननिष्ठ समाजनिर्मिती होणार नाही. नितनवरे म्हणाले, आपापल्या वैचारिक छावण्या बाजूला ठेवून या प्रश्नाचे उत्तर सर्वांनीच शोधावे कारण या हत्या सर्वच धर्मांना मारक आहेत. रामटेके यांनी कृती कार्यक्रम राबविण्यावर भर दिला. याप्रसंगी सर्वच वक्त्यांनी अतिशय महत्त्वाची मते व्यक्त करून या चर्चेला वेगवेगळे आयाम दिले. प्रास्ताविक रमेश बोरकुटे तर आभार डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी मानले.