एकात्मतेची प्रचिती देणारा ‘आय लव्ह माय इंडिया’
By Admin | Updated: August 17, 2014 00:47 IST2014-08-17T00:47:50+5:302014-08-17T00:47:50+5:30
देशाच्या ६८ व्या स्वातंत्र्य दिनाची पूर्वसंध्या..... देशभक्तीच्या वातावरणात रंगलेले श्रोते... देशभक्ती गीतांचे सादरीकरण आणि देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमणारे सभागृह असा नजारा डॉ. वसंतराव देशपांडे

एकात्मतेची प्रचिती देणारा ‘आय लव्ह माय इंडिया’
लोकमत युवा नेक्स्ट : जयहिंद फाऊंडेशन व एम.ए. कादर इंटरनॅशनलची प्रस्तुती
नागपूर : देशाच्या ६८ व्या स्वातंत्र्य दिनाची पूर्वसंध्या..... देशभक्तीच्या वातावरणात रंगलेले श्रोते... देशभक्ती गीतांचे सादरीकरण आणि देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमणारे सभागृह असा नजारा डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात होता. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांची भरगच्च उपस्थिती लाभली.
युवा नेक्स्टच्यावतीने आयोजित हा कार्यक्रम जयहिंद फाऊंडेशन, एम.ए. कादर म्युझिको इंटरनॅशनलच्यातर्फे सादर करण्यात आला. देशभक्ती गीतांचा कार्यक्रम असला तरी रसिकांनी कार्यक्रमाला प्रचंड गर्दी केली होती. पार्श्वगायक एम.ए. कादर यांनी या कार्यक्रमाला प्रारंभ केला मो. रफी यांच्या स्वरातील ‘जहाँ डाल डाल पर सोने की.... हे गीत त्यांनी समरसून सादर करताना प्रारंभिक वातावरण निमिर्ती साधली. त्यानंतर मात्र हा कार्यक्रम गीत, संगीत, नृत्याने बहरत राहिला. एलसीडी प्रोजेक्टरच्या साहाय्याने गीतातील दृश्य रंगमंचावर प्रदर्शित करण्यात येत असल्याने कार्यक्रमाची रंगत वाढली. या नंतर कादरभार्इंनी ‘वतन पे जो फिदा होगा.., अमर वो नौजवाँ होगा, ‘ए मेरे वतन के लोगों’ आदी गीतांनी कार्यक्रमाचा नूरच पालटला. सभागृहातील प्रेक्षक देशप्रेमाच्या रंगात रंगले होते. यावेळी अशोक पटेल यांनी ‘जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारों..... ही गझल तयारीने सादर केली. याप्रसंगी लोधा ग्रुपतर्फे नृत्य सादर करण्यात आले. राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या ओढणीचा उपयोग नृत्यात देशभक्तीची भावना पोहोचविणारा होता. कार्यक्रमात ‘यहां पे कदम कदम पे धरती बदले रंग.., थोडी सी धूल मेरी...,रंग दे बसंती चोला..., सारे जहां से अच्छा, भारत हम को जान से प्यारा आदी गीतांवर धमाल नृत्य सादर करण्यात आल्याने सभागृहात जोश भरला. या प्रसंगी सभागृहातील रसिक ही वय विसरुन आसनांच्या मधल्या जागेत नृत्य करीत होते. यात महिलांचाही लक्षणीय सहभाग होता.
झिनत कादर यांनी ‘वंदेमातरम् सादर करून यावेळी रसिकांनी दाद घेतली. देशभक्ती गीतांचा कार्यक्रम असला तरी जवळपास प्रत्येक गीताला रसिकांचा ‘वन्समोअर’ चा प्रतिसाद लाभत असल्याने आयोजकांचीही पंचाईत होत होती. रसिकांचा आदर करीत हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.
कादरभार्इंनी ‘कर चले हम फिदा वतन साथियो’ या गीताने वातावरण भावपूर्ण केले. देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिवीरांच्या आठवणींनी या प्रसंगी साऱ्यांच्याच डोळ्याच्या कडा ओलावल्या. झिनत कादर यांनी ‘उष:काल होता होता काळ रात्र झाली.... हे गीत सादर करून रसिकांना अंतर्मुख केले. झिनत कादर व एम.ए. कादर यांच्या अनेक गीतांना यावेळी रसिकांची मनमोकळी दाद मिळाली. कादरभार्इंचा पुतण्या ओ.एस. पटेल याने प्रथमच ‘छोडो कल की बातें, कल की बात पुरानी’ हे गीत सादर करून रसिकांकडून वन्समोअर घेतले. रंगमंचावरचे त्यांचे पहिलेच सादरीकरण रसिकांनी डोक्यावर घेतले आणि त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या. यानंतर मूळ भारतीय पण सध्या कॅनडा येथे राहणाऱ्या आणि सारेगम स्पर्धेत अंतिम फेरीत पोहचेलेल्या रिनी चंद्रा हिने आपल्या गोड गळ्याने रसिकांना जिंकले. तिने ‘ए मेरे वतन के लोगो..., ऐ मेरे प्यारे वतन... ये दुनिया एक दुल्हन...., यहां पे कदम कदम पे धरती बदले रंग, जिंदगी की तुटेना लडी....., मै तेनु समझावू..., मेरा रंग दे बसंती चोला आदि गीतांनी कार्यक्रमात जान आणली. या कार्यक्रमाचे मार्मिक भाष्य करणारे निवेदन नासिर खान यांनी केले.
कार्यक्रमाला लोधा धर्मेक्स टीएमटी, आय.एन. आय.एफ.डी.सी, मिन्हाज एन्टरटेन्मेंन्ट, महावीर मेवाला, जयहिंद फाऊंडेशन , आॅरेंज अँड कॉटन बिल्डकॉम प्रा. लि., वेदा, आर्य मेटन्स इथमिक वेअर , टी.बी. झेड यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लखविंदरसिंगजी लख्खा, अनिस अहमद, अतुल कोटेचा, सविता संचेती, सुदत्ता रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)