लोकसभेत कसा धावणार हत्ती ?
By Admin | Updated: June 3, 2017 01:46 IST2017-06-03T01:46:41+5:302017-06-03T01:46:41+5:30
लोकसभा, विधानसभा व नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंंतर बसपाची चिंता वाढली आहे.

लोकसभेत कसा धावणार हत्ती ?
बसपाला नव्या उमेदवाराचा शोध : अंतर्गत गटबाजीमुळे खीळ
कमलेश वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा, विधानसभा व नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंंतर बसपाची चिंता वाढली आहे. बसपाकडून मोठी निवडणूक लढलेला उमेदवार पुन्हा पक्षाकडे फिरकून पाहत नाही, असा इतिहास असल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बसपाला पुन्हा एकदा नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. पक्षांतर्गत टोकाला गेलेले मतभेद, एकमेकांविरोधात उघडपणे सुरू असलेली मोर्चेबांधणी, उत्तर प्रदेशातील पराभवामुळे खचलेले मनोबल या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ताकदीने उभे राहण्याचे आव्हान बसपासमोर आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत बसपाच्या तिकीट वाटपात बराच घोळ झाला. पक्षासाठी अनेक वर्षांपासून झटणाऱ्या बऱ्याच कार्यकर्त्यांना तिकीट मिळाले नाही. बंडखोरी करणाऱ्या तसेच बंडाचा सूर आळवणाऱ्या उत्तम शेवडे व सागर डबरासे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले. निवडणुकीत अंतर्गत वाद एवढा टोकाला गेला की प्रदेशाध्यक्ष विलास गरुड हे एकही जाहीर सभा घेऊ शकले नाहीत. या निवडणुकीत बसपा गटातटात विखुरल्याचे पहायला मिळाले. मात्र, बसपाच्या कॅडरने ‘हत्ती’ सोडला नाही व महापालिकेत १० नगरसेवक निवडून आले. त्यामुळे स्थानिक नेत्यांची शान राखल्या गेली. निवडणूक आटोपली असली तरी बसपातील धूसफूस मात्र कायम आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत बसपाकडून मोहन गायकवाड रिंगणात होते. त्यांना ९६,४३३ म्हणजे सुमारे ८.८९ टक्के मते मिळाली होती. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाने सहाही मतदारसंघात लक्षणीय मते घेतली.
उत्तर नागपुरात बसपाचे उमेदवार किशोर गजभिये हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांनी घेतलेल्या मतांमुळे काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. राऊत तिसऱ्या क्रमांकावर घसरले. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर मोहन गायकवाड व किशोर गजभिये यांनी बसपाशी संबंध तोडले. त्यामुळे आता बसपाला पुन्हा एकदा नव्या उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे.
राज्यातील बसपाला उत्तर प्रदेशातून रसद पुरविली जात होती. मात्र, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत बसपाचा दारुण पराभव झाला. बसपाला तेथेच आता संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे नागपूर, विदर्भ व महाराष्ट्रात किती लक्ष दिले जाईल, हादेखील प्रश्नच आहे.
मनपा निवडणुकीत
पावणे चार लाखांवर मते
महापालिकेच्या निवडणुकीत बसपाचे १०३ उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात होते. या सर्वांना एकूण ३ लाख ९१ हजार मते मिळाली आहेत. प्रत्येक उमेदवाराला सरासरी ३ हजार ७९६ मते मिळाली आहेत. बसपाचे १३ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहे. त्यांना प्रत्येकी ८ ते ११ हजार मते मिळाली आहेत. मतदानाची ही आकडेवारी पाहता कॅडर पक्षापासून फारसे दुरावलेले नसल्याचे स्पष्ट होते. नेत्यांनी एकसंघ होऊन रणनिती आखली तर ‘हत्ती’ जोरात धावू शकतो.
विरोधानंतरही गरुड यांना पुन्हा संधी
प्रदेश अध्यक्ष विलास गरुड यांच्याविरोधात मोठा असंतोष होता. राज्यात लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बसपाच्या दारुण पराभवासाठी गरुड हेच जबाबदार असल्याचे आरोप पक्षांतर्गत विरोधकांकडून जाहीररीत्या करण्यात आले. गरुड यांना आता पदमुक्त करावे, त्यांच्यावर पुन्हा प्रदेश अध्यक्षपदाची धुरा सोपवू नये, गरुड हटाव- बसपा बचाव अशी उघड मोहीम राबविण्यात आली. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपर्यंत गरुड यांच्या विरोधातील पुरावे सादर करण्यात आले. मात्र, यानंतरही बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी गरुड यांचे पंख छाटण्याऐवजी त्यांना पुन्हा प्रदेशाध्यक्षपद सोपवून बळ दिले. आता या संधीचे गरुड कसे सोने करतील याकडे पक्ष पदाधिकारी व कॅडरचे लक्ष लागले आहे.
भाईचारा समित्यांची होणार पुनर्स्थापना
३ मे रोजी लखनौ येथे पक्षाची बैठक झाली. तीत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने दिशा निर्देश जारी करण्यात आले. आजवर खा. वीर सिंग हे एकमेव महाराष्ट्र प्रभारी होते. आता स्थानिक पातळीवरील नेत्यांना वाव मिळावा यासाठी वीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील अॅड. संदीप ताजने व ना.तु. खंडारे या दोन नेत्यांना अतिरिक्त प्रभारी नेमण्यात आले आहे. पक्षाने ओबीसी समाजाला जोडण्याचे काम सुरू आहे. आता नव्याने सर्व समाजाच्या भाईचारा समिती स्थापन केल्या जाणार आहेत. यानंतर जिल्हा स्तर, विधानसभा स्तर, सेक्टर स्तर, पोलिंग बूथ स्तरापर्यंत संघटन बांधणी केली जाणार आहे. यानंतर प्रत्यक्ष मैदानात रणनिती आखली जाईल, असे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.