संगमावरचा शंभू महादेव हे हलाहल कसे पचवत असेल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST2021-02-05T04:59:36+5:302021-02-05T04:59:36+5:30
गणेश हूड/ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रघुजी भोसल्यांच्या सुनेने, म्हणजे मुधोजी यांची पत्नी व दुसरे रघुजींची आई चिमाबाई ...

संगमावरचा शंभू महादेव हे हलाहल कसे पचवत असेल?
गणेश हूड/ लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रघुजी भोसल्यांच्या सुनेने, म्हणजे मुधोजी यांची पत्नी व दुसरे रघुजींची आई चिमाबाई यांनी सीताबर्डीजवळ नागनदी व ओढ्याच्या संगमावर महादेवाचे मंदिर बांधले. भक्तिभावाने स्नान, धार्मिक कार्ये त्या पवित्र संगमावर चालायची. हत्ती डुबतील इतके पाणी असायचे. आता मात्र नागनदी नावाच्या गटारगंगेतील हलाहल तो शंभू महादेव रोज कसे पचवत असेल, हा प्रश्नच अस्वस्थ करून जातो.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात, रघुजी भोसले यांचे दोन पुत्र जानोजी व मुधोजी यांच्यात गादीवरून संघर्ष झाला. पाचगावच्या लढाईत जानोजींच्या मृत्यूनंतर मुधोजींचे पुत्र दुसरे रघुजी सत्तेवर आले. सीताबर्डी येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या मागे नागनदी व ओढ्याच्या संगमावर राजमाता चिमाबाईंनी इ.स. १७७९ मध्ये महादेवाचे देऊळ बांधले. त्याआधी व नंतरही संगमावर स्नानासाठी नगरवासी यायचे. भोसले राजघराण्याचे धार्मिक विधी व्हायचे. विजयादशमीला सजवलेले हत्ती, अश्वदळाची मिरवणूक, शस्त्रपूजा, सीमोल्लंघन व्हायचे. राजघराणे तिथूनच नदी ओलांडून राजाबक्षाच्या मारुतीला जायचे.
नागनदीच्या पुनरुज्जीवनानंतर ते जुने वैभव भलेही परत येणार नाही. तथापि, पुन्हा एकदा हलाहल प्राशन करण्याची शंभू महादेवावर आलेली वेळ तरी दूर व्हावी, इतकी अपेक्षा नागपूरकरांची आहे. कारण हा संगम व मंदिर परिसर, नदीपात्र अतिक्रमणांनी पूर्ण वेढले गेले आहे. नदीच्या पाण्यात पाय टाकू शकत नाही, इतके ते विषारी आहे.
....
चौकट...
नदीकाठच्या इमारती, संस्थांचे पुनर्वसन कसे करणार?
महादेव मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य व प्रदूषणाचा विळखा आहेच. त्याशिवाय, नदी-नाल्याच्या संरक्षण भिंतीवरही बांधकामे झाली आहेत. यशवंत स्टेडियमच्या बाजूने नदी पूर्ण गिळंकृत झाली आहे. बाजूलाच नदीकाठावर झोपडपट्टी आहे. पुढे पटवर्धन ग्राऊंडच्या जागेत नदीला खेटून मेट्रोने बांधकाम, मोक्षधामजवळ कॉटन मार्केटकडून येणारा नाला जिथे नदीला मिळतो तिथे नदीपात्रात खांब टाकून स्लॅब यामुळे नदी प्रवाह अडला आहे. जवळच नदीवर कमी उंचीचा पूल आहे. थोडे पुढे डालडा फॅक्टरीकडे जाणाऱ्या मार्गावरील पूलही असाच कमी उंचीचा आहे. ग्रेट कॅनाल रोडने पुढे गेल्यानंतर मातंग वसाहतीमधील घरे नदीकाठावर खेटून आहेत. तिथेही पुलाच्या खांबांनी प्रवाहाला बाधा निर्माण झाली आहे. केळीबागकडे जाणाऱ्या मार्गावरचाही पूल पुरेसा उंच नाही. बाजूलाच नदीकाठावर मूकबधिर विद्यालय व लोकांची शाळा, बैद्यनाथ चौकातील बहुमजली इमारत, डीएड कॉलेज, होमिओपॅथी कॉलेज व बाजूलाच गायत्री मंदिर या सगळ्या संस्थांचे पुनर्वसन, पर्यायी जागा कशी दिली जाईल, ही समस्या दिसते तितकी छोटी नाही.
.............................................