घरच घरासारखे, इथे माणुसकीच्या भिंती...‘ती’ बनली ‘वार्धक्याची काठी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:08 IST2021-03-08T04:08:10+5:302021-03-08T04:08:10+5:30
महिला दिन विशेष बालाजी देवर्जनकर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘आज्जू जेवलीस का गं? आजोबा काय हवंय तुम्हाला. टीव्ही ...

घरच घरासारखे, इथे माणुसकीच्या भिंती...‘ती’ बनली ‘वार्धक्याची काठी’
महिला दिन विशेष
बालाजी देवर्जनकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आज्जू जेवलीस का गं? आजोबा काय हवंय तुम्हाला. टीव्ही लावू का? चेस, कॅरम खेळायचाय का, की सापसिडी आणू? बाहेर गार्डनमध्ये फिरायला जाऊयात का? मी आहे ना सोबत.’ आजारग्रस्त, दुर्धर व्याधींनी ग्रस्त असलेल्या आजी-आजोबांच्या नागपुरातील हक्काच्या घरातील हा प्रसंग. ज्याचे नाव आहे ‘समाधान.’ आपण आपल्याच घरात राहतोय, हे समाधान वेगळेच. मुलगी, सून होऊन पल्लवी काळजी घेतेय हा रोजचा क्षण अधिक समाधानाचा. माणुसकीच्या या भिंतीत जगताना मिळणारे समाधान वाटून घेणाऱ्या पल्लवी हुमनाबादकरांनी या सर्वांनाच वार्धक्याची काठी बनून जगण्याचा हक्क आणि आधार मिळवून दिला आहे. महिलादिनी पल्लवीच्या या कर्तृत्वाला सलाम करूया.
प्रसिद्धीपासून दूर व सोशल मीडियावर काहीशा ॲॅक्टिव्ह असलेल्या सोमलवाड्यातील पायोनिअर सोसायटीतील क्रमांक ३५ या घरावर तुम्हाला कुठलाही फलक दिसणार नाही. पण, जगण्याचे समाधान पल्लवी यांनी या सेवेत नक्कीच शोधलेय. पती सुजितला मुंबईत कंपनीत जॉब होता. काही वेगळे करायला हवे, असा निर्णय घेऊन दोघांनीही मुंबई सोडली अन् हेच जगण्याचे ‘समाधान’ शोधले. आता विदर्भच नव्हे तर पुण्या-मुंबईपासून त्यांना कॉल येतात. आम्हालाही यायचंय तुमच्याकडे. ‘समाधान’ घर हे वृद्धाश्रम मुळीच नाही, रुग्णालयही नाही. पण, मानसिक आधाराचे आनंददायी घर नक्कीच आहे. तुम्हाला असेही वाटेल की मुलगा, मुलगी किंवा सून यांच्यामुळे त्रासले म्हणून किंवा त्यांना आजाराची काळजी नाही म्हणून त्यांना या ठिकाणी सोडले. असे मुळीच नाही. उच्चपदस्थ राहिलेले अनेक वृद्ध, महिलांसह सामान्य घरातील अनेक या ठिकाणी आयुष्याची सायंकाळ व्यतीत करीत आहेत. अनेक घरी मुलगा नोकरीवर असतो, सून नोकरी करते, मुले शिकत असतात. अशावेळी घरात कुणी व्याधींनी ग्रस्त असेल तर त्यांची काळजी अधिक असते. अशा सर्वांची काळजी इथे घरासारखीच घेतली जाते आणि ते बरे झाले की घरीही जातात. अगदी कायमस्वरूपी राहायचे असेल तर तीही सुविधा आहे.
अल्झायमर, कॅन्सर, मानसिक आजाराने ग्रस्त, अपघातग्रस्त, पॅरालिसिस अशा अनेक दुर्धर व्याधी असलेले, अगदी व्हेंटिलेटरवर असलेले आजी-आजोबा इथे येतात. वार्धक्य म्हटलं की त्यांच्या प्रत्येक आवडीनिवडी जपाव्या लागतात. त्यांच्या कलाने सगळे करावे लागते. समाधान हे आहे की त्यांना इथे आल्यानंतर घराची आठवण येत नाही. आजवर पन्नासहून अधिक जण इथे राहिलेत, राहून घरी गेले आहेत. अजूनही अनेक आहेत. राहणाऱ्यांना वयाचे बंधन नाही. सर्वांच्याच सेवेसाठी नर्सेस, अटेंडेंट आहेत. कॉलवरील डॉक्टर सेवा देतात. नामवंत डॉक्टर उपचारासाठी तत्पर असतात. अनेकदा बाहेरगावाहून आलेल्या आजी किंवा आजोबांना हॉस्पिटलमध्ये न्यायचे असते. अशावेळी स्वत: काळजी घेतो. त्यांच्यासोबत जातो. कोविड काळात तर अनेकांना वयोवृद्धांना सांभाळायचे म्हणजे खूपच धोकादायक वाटायचे. पण, आम्ही सर्व काळजी घेतली. त्यांना सांभाळले. पती सुजित या सेवेत कधीच खंड पडू देत नाही. अनेकदा माझी दहा वर्षाची मुलगी सानिका हीसुद्धा तितकीच काळजी घेते. तिच्यासाठी हेच सगळे आजी-आजोबा आहेत... पल्लवी समाधानी आयुष्याच्या आठवणी उलगडत होत्या.
खेळांच्या आवडीनिवडी ते बर्थडे सेलिब्रेशनपर्यंत
बुद्धिबळ, चेस, सापसिडी, कॅरम हे आवडेल ते खेळ रोजच इथे खेळले जातात. आजी-आजोबांना रोज फिरायला नेणे. लायब्ररीत पुस्तके, पेपर वाचायला देणे. मनोरंजनात्मक कार्यक्रमातून त्यांना आनंद देणे. आवडीनुसार पथ्य पाळायला लावून त्यांना जेवायला देणे. एवढेच नाही तर त्यांचे बर्थडे सेलिब्रेशनही मोठ्या जल्लोषात होते. या उत्साहात त्यांचाही उत्साह द्विगुणित होतो. कुणी गाणी म्हणतात. कुणी नाचतात.
समाधानाच्या शोधात, गोव्याहून नागपुरात
आयुष्यात माणसाला कुठल्याही गोष्टीत समाधान हवं असतं. समाधानमध्ये सेवा देणाऱ्या मीरा आजी तशा मूळच्या गोव्यातील. पण, त्यांना सेवेची आवड. त्यांना वयोवृद्धांची सेवा करायची होती. त्यांना नागपूरचे ’समाधान’ आवडले. त्याही सेवेत मग्न असतात. चहापासून ते त्यांच्या आवडीनिवडीच्या चविष्ट जेवणाची काळजी त्या घेतात. समाधानच्या या ‘अन्नपूर्णा’च आहेत. दूरदुरून कुठलेही नाते नसलेल्या मीरा आजींनी सांगितले...आता हेच माझे घर आहे. ही लेक, जावई अन् नात. आयुष्याचे संचित त्यांनी या सेवेत शोधले आहे.
इथे या..समाधान मिळेल! ()
गुजरातमध्ये रेल्वेत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून सेवा केलेले यशवंत कोठेकर हे आजोबा या ठिकाणी आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांची पत्नी गेली. त्यांना अपत्य नाही. धंतोलीत फ्लॅट होता. तो विकला. आता ते समाधानमध्ये राहतात. ‘अगदी घरच्यासारखं आहे हो. हा मुलगा अन् हीच सून आहे माझी. असे समाधान कुठेच मिळणार नाही.’ आजोबा या दाम्पत्याचे कौतुक करीत होते.