मतदारांना गृहीत धरणे भोवले
By Admin | Updated: May 18, 2014 01:05 IST2014-05-18T01:05:26+5:302014-05-18T01:05:26+5:30
परंपरागत मतदारांना गृहीत धरून काँग्रेसने शेवटपर्यंत विजयाचे गणित मांडले. मतमोजणीच्या दिवसापर्यंतचा अतिआत्मविश्वास नडला आणि काँग्रेसचा येथेच घात झाला.

मतदारांना गृहीत धरणे भोवले
ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ
परंपरागत मतदारांना गृहीत धरून काँग्रेसने शेवटपर्यंत विजयाचे गणित मांडले. मतमोजणीच्या दिवसापर्यंतचा अतिआत्मविश्वास नडला आणि काँग्रेसचा येथेच घात झाला. आदिवासीबहुल मतदारसंघातही शिवसेनेने प्रचंड आघाडी घेतली. शिवसेनेची ही आघाडी काँग्रेससह सर्वांनाच आत्मचिंतन करायला लावणारी आहे. काँग्रेसने सुरुवातीपासूनच या निवडणुकीत आदिवासी मतदारांवर लक्ष केंद्रित केले होते. काँग्रेसचा हा परंपरागत मतदार उमेदवारही त्याच समाजाचा असल्याने काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील, असा दावा होता. या सोबतच भाजपविरोधी मतदारही काँग्रेसलाच मदत करतील, अशी अपेक्षा होती. या गणिताच्या आखाड्यातून काँग्रेस यवतमाळ-वाशिममध्ये निश्चितच विजयी होईल, असे शेवटपर्यंत सांगितले जात होते. मात्र मतमोजणीनंतर सर्वांचा फुगा फुटला. पुसद वगळता आदिवासीबहुल मतदारसंघातही काँग्रेसला आघाडी घेता आली नाही. राळेगाव हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघात आदिवासी समाजाची निर्णायक मते आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार वसंतराव पुरके या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मोघेसाहेबांसाठी त्यांनी जीवाचे रान केले. मात्र शिवसेनेने याच मतदारसंघात २७ हजार ५५ मतांची आघाडी घेतली. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला २८ हजार ३८८ मतांची आघाडी मिळाली. ही आघाडीही काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह सारे दिग्गज यवतमाळ शहरात असतात. मात्र त्यांनाही आपला प्रभाव मतदारांवर टाकता आला नाही. दारव्हा या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या गृह मतदारसंघातही शिवसेनेने आघाडी घेतली. शिवसेनेचे आमदार संजय राठोड प्रतिनिधित्व करीत असलेल्या या मतदारसंघानेही शिवसेनेलाच जवळ केले. वाशिम या भावना गवळींच्या गृह मतदारसंघात चांगलीच आघाडी घेतली. मात्र कारंजा विधानसभेत मोठ्या आघाडीची अपेक्षा असताना सेनेला तीन हजार ९६२ मतांचीच आघाडी मिळाली. पुसद या एकमेव मतदारसंघात काँग्रेसला २१ हजार २४१ मतांची आघाडी मिळाली. काँग्रेसचे सुरुवातीपासून पुसद आणि राळेगाव या दोन मतदारसंघातील आघाडीवरच विजयाचे गणित होते. पुसदनेही अपेक्षित आघाडी दिली नाही आणि राळेगाव तर आघाडीत सपसेल नापास झाला. भावना गवळींनी ९३ हजार ८१६ मताधिक्य घेतले. २००९ च्या निवडणुकीपेक्षाही त्यांच्या मताधिक्यात यावेळी वाढ झाली आहे. एवढ्या मोठ्या मताधिक्याची शिवसेनेला अपेक्षा नव्हती. गवळी यांना झालेल्या मतदानाच्या ४६.३२ टक्के मते मिळाली. तर काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांना ३७ टक्के मते मिळविता आली. दोन उमेदवार वगळता सर्वांचीच अनामत जप्त झाली. ५० हजारांच्या आत तिसर्या क्रमांकावरील उमेदवाराला समाधान मानावे लागले. मनसे फॅक्टरही येथे कुचकामी ठरला. जय-पराजयाच्या कारणांचा शोध आता राजकीय विश्लेषक घेतील. मात्र काँग्रेसला मतदारांना गृहीत धरणेच अधिक भोवले आणि त्यातच शिवसेनेच्या विजयीची आघाडी वाढली.