कस्तूरचंद पार्कवरील ऐतिहासिक वास्तू संकटात
By Admin | Updated: August 14, 2016 02:25 IST2016-08-14T02:25:15+5:302016-08-14T02:25:15+5:30
शहराच्या मध्यभागी असलेल्या कस्तूरचंद पार्कला आता लोक प्रदर्शन लगण्याचे ठिकाण म्हणून ओळखू लागले आहे.

कस्तूरचंद पार्कवरील ऐतिहासिक वास्तू संकटात
भिंतींना तडा : कसे होणार संवर्धन ?
नागपूर : शहराच्या मध्यभागी असलेल्या कस्तूरचंद पार्कला आता लोक प्रदर्शन लगण्याचे ठिकाण म्हणून ओळखू लागले आहे. येथे वर्षभर कोणते ना कोणते प्रदर्शन सुरू असते. यामुळे येथील मैदानाची स्थिती चिंताजनक झाली आहे. या मैदानाच्या मधोमध असलेल्या हेरिटेज वास्तूकडे देखील कमालीचे दुर्लक्ष होत आहे. या इमारतीची दुरवस्था होत आहे.
ही हेरिटेज वास्तू दगडांना कोरून तयार करण्यात आली आहे. मात्र, देखभाल दुरुस्ती नसल्यामुळे या इमारतीच्या भिंतींना तडे जाऊ लागले आहे. एवढेच नव्हे तर हे स्थळ आता असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनू लागले आहे. असामाजिक तत्त्वांनी या इमारतीच्या भिंतींवर नावे लिहून, विचित्र चित्र काढून त्या विद्रुप केल्या आहेत. बस्तान घेऊन फिरणारे लोक येथे रात्रीचा ठिय्या मांडतात. तेथेच स्वयंपाक करतात. त्यांना रोखणारे येथे कुणीच नाही. पावसामुळे या संपूर्ण मैदानात चिखल झाला आहे. त्यामुळे येथे कोणत्याही खेळांच्या स्पर्धा होताना दिसत नाही. (प्रतिनिधी)
रात्री असामाजिक तत्त्वांचा अड्डा
कस्तूरचंद पार्क हे रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटरवर आहे. रात्रीच्या वेळी कस्तूरचंद पार्कवरील हेरिटेज वास्तूमध्ये असामाजिक तत्त्वांचा अड्डा असतो. येथे जुगार खेळला जातो. दारु घेतली जाते. असामाजिक तत्त्वांच्या हालचाली येथे सुरू असतात. याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या, मात्र त्यावर अंकुश आणण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली नाहीत.
जिल्हा प्रशासनाची जबाबदारी
या मैदानाची देखभाल दुरुस्ती करणे ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे. जिल्हा प्रशासनातर्फेच संबंधित मैदान भाड्याने दिले जाते. मात्र, असे असताना या मैदानाच्या मधोमध असलेल्या हेरिटेज वास्तूकडे मात्र जिल्हा प्रशासनाचे लक्ष नाही. या इमारतीच्या कॉलमला भेगा पडू लागल्या आहेत.