खाऊच्या पैशातून शेतकऱ्यांना मदत
By Admin | Updated: September 21, 2015 02:59 IST2015-09-21T02:59:15+5:302015-09-21T02:59:15+5:30
खाऊचे पैसे म्हणजे लहान मुलांसाठी लाखमोलाची गोष्ट असते.

खाऊच्या पैशातून शेतकऱ्यांना मदत
नागपुरातील बालिकेची संवेदना : मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
नागपूर : खाऊचे पैसे म्हणजे लहान मुलांसाठी लाखमोलाची गोष्ट असते. याच पैशातून आपल्यासाठी अन्न उगविणाऱ्या शेतकऱ्याला मदत व्हावी या भावनेतून नागपूरच्या आठ वर्षीय रसिका जोशी या बालिकेने मुख्यमंत्री मदतनिधीला सर्व पैसे दिले. खाऊच्या पैशांची रक्कम जरी छोटी असली तरी यातून तिने राज्यातील जनतेला आभाळभर मोठी अशी प्रेरणा दिली आहे.
दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था फारशी चांगली नाही. बॉलिवूडस्टार आमीर खान याने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेऊन मुख्यमंत्री मदतनिधीसाठी चेक दिला. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये बातम्या पाहिल्यानंतर रसिकाने वडील मनोज जोशी यांना विचारणा केली असता राज्यातील शेतकरी कसे संकटात आहेत व आमीर खान हा चेक त्यांच्या मदतीसाठी देत असल्याचे त्यांनी समजावून सांगितले. ज्या शेतकऱ्यांच्या कष्टांमुळे शाळेतील टिफीनमधले अन्न मी खाऊ शकते, ते संकटात असल्याचे ऐकताच रसिकाच्या बालमनालादेखील वाईट वाटले व तिने कुणालाही न सांगता साठविलेले सर्व पैसे एकत्र केले. परिचितांसोबत रविवारी मुख्यमंत्र्यांकडे गेली असता रसिकाने खाऊचे पैसे साठवून ठेवलेली ‘पिगी बँक’च त्यांना सुपूर्द केली व या रकमेतून शेतकऱ्यांना मदत करा, असे सांगितले.(प्रतिनिधी)
ही मौलिक मदत : मुख्यमंत्री
बळीराजाच्या मदतीसाठी एका आठ वर्षांच्या मुलीने केलेली ही मदत मौलिक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या वयातील मुलीमध्ये ही संवेदना असणे हीच फार मोठी सुखावह बाब आहे. तिने दिलेली रक्कम निश्चितपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. ही रक्कम लहान असली तरी यातून समाजाला निश्चितच मोठी प्रेरणा मिळेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.