हायकोर्टात आज श्रीसूर्याच्या सीबीआय चौकशीवर सुनावणी
By Admin | Updated: June 8, 2015 03:01 IST2015-06-08T03:01:48+5:302015-06-08T03:01:48+5:30
श्रीसूर्या पीडित ठेवीदार कृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल करून श्रीसूर्या फसवणूकप्रकरणाचा...

हायकोर्टात आज श्रीसूर्याच्या सीबीआय चौकशीवर सुनावणी
नागपूर : श्रीसूर्या पीडित ठेवीदार कृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल करून श्रीसूर्या फसवणूकप्रकरणाचा ‘सीबीआय’मार्फत तपास करण्यात यावा, अशी विनंती केली आहे. या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व प्रदीप देशमुख यांच्या न्यायपीठासमक्ष सुनावणी होणार आहे.
याप्रकरणात पोलिसांनी प्रचंड निष्काळजीपणा दाखविला आहे. पोलिसांनी श्रीसूर्या समूहाचा अध्यक्ष समीर सुधीर जोशी व संचालिका पल्लवी समीर जोशी यांना १ महिना उशिरा अटक केली. यामुळे त्यांना वादग्रस्त संपत्ती लपविण्यास व पुरावे नष्ट करण्यासाठी बराच वेळ मिळाला. जोशी दाम्पत्याला पोलिसांची अप्रत्यक्षरीत्या मदतच झाली. परिणामी पीडित ठेवीदारांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. पोलिसांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
जोशी दाम्पत्याविरुद्ध राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर २०१३ रोजी भादंविच्या कलम ४२०, ३४ आणि महाराष्ट्र ठेवीदारांचे हित व संरक्षण कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शासनाच्या प्रतिज्ञापत्रानुसार श्रीसूर्या इन्व्हेंस्टमेंट कंपनी ही भागीदारी कायदा व कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत नाही. तसेच, या कंपनीने गुंतवणूक योजना राबविताना रिझर्व्ह बँकेची परवानगीही घेतली नव्हती. पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरू असल्यामुळे प्रकरण ‘सीबीआय’कडे हस्तांतरित करण्याची मागणी निरर्थक असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)