मूल्यांकनात हलगर्जी; प्राध्यापकांवर कारवाई ?

By Admin | Updated: August 24, 2016 03:04 IST2016-08-24T03:04:47+5:302016-08-24T03:04:47+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनासमोर सध्या सर्वात मोठे आव्हान आहे

Haljarga in evaluation; Proceedings on the professors? | मूल्यांकनात हलगर्जी; प्राध्यापकांवर कारवाई ?

मूल्यांकनात हलगर्जी; प्राध्यापकांवर कारवाई ?

नागपूर विद्यापीठ : शिस्तपालन समितीकडे प्रकरण पाठविणार, ‘बीएसस्सी’च्या निकालांची डोकेदुखी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनासमोर सध्या सर्वात मोठे आव्हान आहे ते ‘बीएसस्सी’च्या चार सत्रांच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल लावण्याचे. प्राध्यापकांच्या हलगर्जीपणामुळे २० हजारांहून अधिक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन बाकी आहे. काही प्राध्यापक तर एकदाही मूल्यांकनासाठी आलेले नसून त्यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत विद्यापीठाने दिले आहेत. संबंधित प्राध्यापकांची प्रकरणे शिस्तपालन समितीकडे वर्ग करण्यात येतील, अशी माहिती परीक्षा नियंत्रकांनी दिली आहे.
नागपूर विद्यापीठाच्या बहुतांश महत्त्वाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असले, तरी ‘बीएसस्सी’ अभ्यासक्रमाच्या पहिल्या ४ सत्रांच्या २० हजारांहून अधिक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन रखडलेले आहे. विज्ञान महाविद्यालयांतील प्राध्यापक नियमितपणे मूल्यांकनाला येत नसल्याने ही स्थिती ओढवलेली आहे. एकीकडे हिवाळी परीक्षांची तयारी सुरू झाली असताना ‘बीएसस्सी’च्या प्रलंबित निकालांमुळे परीक्षा विभागाची दमछाक होत आहे. शिवाय विद्यार्थ्यांचेदेखील नुकसान होत आहे. विद्यापीठाने यासंदर्भात १४२ प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीसदेखील बजावली आहे. परंतु काही प्राध्यापक मूल्यांकनासाठी आलेलेच नाही. अशा प्राध्यापकांवर कारवाई करणे गरजेचे असून शिस्तपालन समितीकडे त्यांची प्रकरणे पाठविण्यात येतील, असे परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी यांनी स्पष्ट केले आहे.(प्रतिनिधी)

कारवाई केली तरी फटकाच
दरम्यान, विद्यापीठातील अनेक अधिकारी विज्ञान महाविद्यालयांतील प्राध्यापकांवर कारवाई करण्याच्या पक्षात नाहीत. अगोदरच विज्ञान शाखेत मूल्यांकनाची बोंब आहे. त्यात कारवाई झाली तर त्याचा फटका विद्यापीठालाच बसणार आहे. याबाबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना विचारणा केली असता त्यांनी सध्या कारवाईपेक्षा विद्यार्थ्यांचे निकाल जास्त महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. मूल्यांकन लवकरात लवकर कसे होईल यावर आमचा भर असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

२९ आॅगस्टपर्यंत निकाल जाहीर ?
विद्यापीठाने उन्हाळी परीक्षांचे ८२५ च्या जवळपास निकाल जाहीर केले आहेत. इतर परीक्षांचे निकाल २९ आॅगस्टपर्यंत लावण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. ‘बीएसस्सी’ वगळता इतर निकाल त्या कालावधीत लावण्यात येतील. जर प्राध्यापक हवे त्या प्रमाणात आले तर २९ आॅगस्टपर्यंत ‘बीएसस्सी’चेदेखील बहुतांश मूल्यांकन पूर्ण होईल, असा विश्वास परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांनी व्यक्त केला.

संस्थाचालक,
प्राचार्यांना विनंती
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक महाविद्यालयांकडून प्राध्यापकांना मूल्यांकनासाठी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत मागील आठवड्याात विद्यापीठात प्राचार्यांची बैठकदेखील घेण्यात आली होती. प्राध्यापकांना सर्व कामांतून आठवडाभर दूर ठेवून मूल्यांकनाला पाठविण्यात यावे, अशी विनंती संस्थाचालक व प्राचार्यांना परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Haljarga in evaluation; Proceedings on the professors?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.