गटारगंगा अशी की तुळशीबागेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST2021-02-05T04:59:32+5:302021-02-05T04:59:32+5:30
गटारगंगा अशी की तुळशीबागेत नाकाला रुमाल लागतोच! नाग पुनरुज्जीवन परिक्रमा : जगनाडे चौक ते हिवरीनगर गणेश हूड/ लोकमत न्यूज ...

गटारगंगा अशी की तुळशीबागेत
गटारगंगा अशी की तुळशीबागेत
नाकाला रुमाल लागतोच!
नाग पुनरुज्जीवन परिक्रमा : जगनाडे चौक ते हिवरीनगर
गणेश हूड/ लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भोसले काळात शुक्रवारी परिसराला थडगा नाग म्हणत. पहिले, दुसरे आणि तिसरे रघुजी यांच्या याच परिसरात समाध्या आहेत. दुसऱ्या रघुजींचे पुत्र परमेजी यांची पत्नी काशीबाई सती गेल्यामुळे इथल्या एका देवळाला काशीबाईचे देऊळ म्हणतात. राजघराण्याने नाग नदी व समाधी स्थळांचे पावित्र्य जपले. आज मात्र नाग नदीची गटारगंगा बघून काशीबाईंचा आत्मा अशांत तर नसेल, असा विचार प्रत्येकाला अस्वस्थ करून जातो.
दुसऱ्या रघुजी भोसलेंनी नाग नदीच्या काठी तुळशीबागेतच राजवाडा, नाट्यगृह आणि इतर इमारती बांधल्या. या राजवाड्यातच ते दुपारच्या विश्रांतीसाठी येत असत. दिवाळीत नाग नदीच्या तीरावर रोषणाई करण्यात येई. ती पाहण्यासाठी सबंध शहर जमा होत असे. आता मात्र विश्रांती तर सोडा, नदीकाठावर वास्तव्यास असलेल्यांना हवेची झुळूक आली की, नाग नदीच्या गटारगंगेमुळे हवेमुळे तुळशीबागेत नाकावर रुमाल ठेवावा लागतो.
नाग नदीच्या काठी डाव्या तीरावर शुक्रवारी पेठ विभागली गेली होती. एका विस्तृत आवारात भोसले घराण्यातील व्यक्तींसाठी एक स्मशानभूमी राखून ठेवलेली होती. त्या आवारात उत्कृष्ट शिल्पकलेने युक्त अशी भोसल्यांची समाधी मंदिरे आहेत. पुनरुज्जीवनानंतर भलेही नाग नदीला गतवैभव मिळणार नाही; परंतु नदीपात्रातील दुर्गंधी तर दूर होईल.
.....
नदीकाठावर बांधकामे करण्यात सरकारी यंत्रणाही
नाग नदीच्या उगमापासून थोडे पुढे गेले की घाणीचे साम्राज्य आहेच. त्याशिवाय नदीच्या काठावर बांधकामे झाली आहेत. यात सरकारी यंत्रणाही मागे नाहीत. जगनाडे चौकात नासुप्रने उभारलेल्या पार्किंग प्लाझाचे बांधकाम नदीकाठावर केले आहे. बाजूलाच गंगाबाई घाट, नदीकाठावर झोपडपट्टी आहे. आता पक्की घरे झाली आहेत. पुढे के.डी.के. कॉलेजलगतचा परिसर, शास्त्रीनगर, हिवरीनगर, देशपांडे ले-आऊट, व्यंकटेश सिटी, लोकजीवन नगर, बगडगंज, कुंभार टोलीचा, देशपांडे ले-आऊट, जुना स्लमचा भाग आहे. या वस्त्या नदीकाठावर वसलेल्या आहेत. नदीच्या दोन्ही काठांवरील वस्त्यांना जोडण्यासाठी नदीवर पूल उभारण्यात आले आहेत. या पुलांची उंची कमी आहे. हिवरीनगर येथील नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाच्या बाजूने जलवाहिनी गेल्या आहेत. पुलाच्या दुसऱ्या बाजूला वेस्ट वॉटर लाईन गेली आहे. बाजूलाच नदीकाठावर गार्डन आहे.
......
कॉलनीतील सिवरेज नदीत
व्यंटकेश सिटी, नंदनवन झोपडपट्टी व आजूबाजूला असलेल्या वसाहतींनी सिवरेजची योग्य प्रकारे विल्हेवाट लावलेली नाही. या वसाहतीमधील सिवरेज थेट नदीपात्रात सोडले जाते. परिसरातील झोपडपट्ट्यांत सिवरेज लाईनची यंत्रणा नसल्याने सिवरेज थेट नदीपात्रात सोडले जाते. यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित होण्यासोबतच लोकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.